मुंबई :कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे सर्वार्थाने लोककल्याणकारी राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील जनतेसाठी शिक्षणाची दारे खुले केली. सर्व धर्मीयांसाठी वस्तीग्रह निर्माण करून त्यांनी सर्वांनी शिक्षण घ्यावे. यासाठी शिक्षणाचा सक्तीचा कायदा कोल्हापूर संस्थानात केला. छत्रपती शाहू महाराजांना समाजातील अस्पृश्यता अजिबात मान्य नव्हती. त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक उपक्रम राबवले.
गंगाराम कांबळेला मारहाण :छत्रपती शाहू महाराजांच्या घोड्याच्या पागेत काम करणारा गंगाराम कांबळे हा मराठ्यांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदावर पाणी घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी दलित समाजातील व्यक्तीने हौद बाटवला म्हणून मराठा समाजातील सवर्णांनी गंगाराम कांबळेला जबरदस्त मारहाण केली. शाहू महाराज त्यावेळी कोल्हापुरात नव्हते. कोल्हापुरात शाहू महाराज पुन्हा आल्यानंतर गंगाराम कांबळेने शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
महाराजांनी दिली मारेकऱ्यांना शिक्षा :छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी मराठा समाजातील ज्या लोकांनी मारहाण केली होती. त्या लोकांना बोलावून स्वतः त्यांना चाबकाच्या फटक्यांनी झोडपून काढले. तसेच गंगारामच्या पाठीवर हात ठेवून त्याला सांगितले की, तू स्वतंत्र स्वतःचा व्यवसाय सुरू कर.