महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 18, 2020, 9:41 AM IST

ETV Bharat / state

मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त 20 मिनिटांत, भारतातील समुद्रात सर्वात मोठ्या पुलाचे काम सुरू

मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3-3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची (पोहोचमार्ग) 5.5 किमी लांबीचा आहे.

trans harbour link road
मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त 20 मिनिटांत, भारतातील समुद्रात सर्वात मोठ्या पुलाचे काम सुरू

मुंबई -देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला वाहतूक कोंडीने ग्रासले असताना एका नव्या प्रलंबित प्रकल्पाच्या माध्यमातून आता दिलासा मिळणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे पावणे दोन तासाचे अंतर पुढील दोन वर्षात 20 मिनिटांवर येणार आहे.

मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त 20 मिनिटांत, भारतातील समुद्रात सर्वात मोठ्या पुलाचे काम सुरू

मुंबई पारबंदर-शिवडी ते न्हावा-शेवा या ट्रान्सहार्बर प्रकल्पाच्या महत्त्वाच्या सागरी सेतूच्या कामाचा महत्त्वपूर्ण टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्पात भारतातील सर्वात मोठय़ा लांबीचा समुद्रावरील पूल मुंबईत उभा राहणार आहे. मुंबई ते पारबंदर या 22 किमी लांबीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पुणे एक्स्प्रेस-वे आणि त्यापुढे दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास करणे सहज व वेगवान होणार आहे. तसेच मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार होणार आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे 30 वर्षापासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी, या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. सरकारने 4 फेब्रुवारी 2009 च्या सरकार निर्णयाद्वारे या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात आली आहे. त्याप्रमाणे या प्रकल्पाकरिता एमएमआरडीएतर्फे निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही आदेश देण्यात आले.

मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3-3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची (पोहोचमार्ग) 5.5 किमी लांबीचा आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील शीवाजी नगर, राज्य मार्ग 54 व राष्ट्रीय महामार्ग 4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल आहेत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास यामुळे होणार असून मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. सध्या दक्षिण मुंबईतून नवी मुंबई जाण्यासाठी दीड ते पावणे दोन तासाचा कालावधी लागतो हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी अर्धातास ते पाऊण तासावर येईल असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी ईटीवी भारतशी बोलताना सांगितले.

मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यामधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बदल होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई पारबंदर प्रकल्पाची अंमलबजावणी जायका (जेआयसीए-जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) या जपानी शासन पुरस्कृत संस्थेकडून कर्ज प्राप्त करून करण्यात येत आहे. जायकाने सदर प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 17 हजार 884 कोटी रुपये इतकी निश्चित केली आहे. या किमतीमध्ये बांधकामाची किंमत महागाई, आकस्मिक बाबींवरील खर्च, भूसंपादन, प्रशासकीय खर्च, बांधकामाच्या कालावधीतील व्याज इ. बाबींचा समावेश आहे. या प्रकल्पाचा आवाका पाहता हा देशातील सर्वात मोठा समुद्रावरील पूल असेल असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले.

दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होणार -

प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे व १ इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्पामध्ये 2200 पाईल कॅप (पिलर) उभारण्यात येणार असून आतापर्यंत 400 पाईलकॅप बांधून तयार झाले आहेत. तसेच शंभर टक्के जिओ टेक्निकल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी येथील बीपीटीच्या जागेवर, शिवाजीनगर आणि चिर्ले या ठिकाणी कास्टिंग यार्ड बनविण्यात आले असून, आवश्यक ती साधनसामग्री येथे ठेवण्यात आली आहे. सद्यस्थिती-शिवडी न्हावा शेवा पोरबंदर प्रकल्पाचे 15 टक्के मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावा या दोन भूखंडाना जोडणा-या सागरी सेतू (शिवडी न्हावा-शेवा पोरबंदर ) प्रकल्पाचे सुमारे 14 टक्के काम पूर्ण झाले आहे.

अक्राळ-विक्राळ वाढणारी शहरे आणि त्यांचा भविष्यातील पायाभूत सुविधांचा अभाव यातून नवे पायाभूत प्रकल्प ही काळाची गरज आहे त्यातूनच मुंबई पारबंदर शिवडी-न्हावाशेवा समुद्र सेतू प्रकल्प पुढील दोन वर्षात साकारला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details