महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2022, 10:06 AM IST

Updated : Dec 4, 2022, 10:54 AM IST

ETV Bharat / state

Nipponzan Myohoji : मुंबईतील जपानी बौद्धविहाराशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सबंध, जाणून घ्या इतिहास

१९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले. त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार ( Buddha Vihara built under Worli Hill ) बांधले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील तिथे अनेक भाषणे केली. त्यामुळे बौद्ध बांधवासाठी ते एक प्रेरणास्थान आहे.

Buddhist monks
बौद्ध विहार

मुंबई : मुंबईतील वरळी पोद्दार हॉस्पिटल समोरील हे एक जपानी बौद्ध विहार असून त्याचे नाव 'निप्पोन्झान म्योहोजी' असे ( Nipponzan Myohoji inspiration for Buddhist monks) आहे. येथे गगनाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्धविहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते.

टी मोरिता

1931 च्या दरम्यान जपानी धर्मगुरू भारतात : सन १९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात ( Japanese Nichiren Sect Buddhist Fuji ) आले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार बांधले. सन १९५० च्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व दोन वर्षात पूर्ण करण्यात आले. नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्यात आले. त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली. या विहाराचे नूतनीकरणाचे काम चालू असताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिली होती. तसेच येथे त्यांनी सभा सुद्धा घेतली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धविहार : सन १९५० च्या दरम्यान भारतीय संविधानाचे काम पूर्ण होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मागे लागले. २ जानेवारी १९५० रोजी ते दिल्लीवरून मुंबईस परतले. त्यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबई प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळ आणि इतर मराठी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १४ एप्रिल १९५० रोजी त्यांचा जन्मदिवस सर्व भारतभर साजरा करण्यात आला. २५ मे १९५० रोजी ते विमानाने कोलंबो (सिलोन) येथे गेले. तिथे त्यांनी भारतातील बौद्धधर्म या विषयावर भाषण दिले. तिथून येताना त्रिवेंद्रम आणि मद्रास येथे त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दिनांक २९ सप्टेंबर १९५० रोजी त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात भाषण दिले व लोकांना बौद्धधर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थनासाठी व प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करीन असे त्यांनी जाहीर ( Speeches of Babasaheb Ambedkar ) केले. ते हेच बुद्ध विहार आहे, जे नूतनीकरणानंतर जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

अनुयायांसाठी प्रेरणास्थान :ही एक आता पवित्र ऐतिहासिक वारसा वास्तू आहे जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यानंतर पुन्हा १३ महिन्यांनी म्हणजे दिनांक २२ डिसेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत पुन्हा वरळीला आले असताना या नवीन बुद्धविहारात येऊन बुद्ध वंदना करून बौद्ध धर्मा संबंधी भाषण दिल्याचा उल्लेख आढळतो. याप्रमाणे वरळीच्या बुद्ध विहारात त्यांनी २९ सप्टेंबर १९५० व २२ डिसेंबर १९५१ साली बुद्ध वंदना करून भाषण दिल्याने हे विहार बौद्ध बांधवासाठी एक प्रेरणास्थान झाल्याचे दिसून येते.

बुद्धांच्या जीवनावर आधारित तैलचित्रे : सद्यस्थितीत या विहाराची अंतर्गत देखभाल जपानची 'निप्पोन्झान म्योहोजी' ही संस्था करते. १९७६ मध्ये जपानचे भिक्खू 'टी मोरिता' येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोजची वंदना व पोर्णिमेचे कार्यक्रम करण्यात येतात. या विहारात बुद्धांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्यांची चकाकी कमी झालेली नाही. येथील बुद्धमूर्ती ही अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना असून तिची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्वकाही विसरून नवचैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो.

Last Updated : Dec 4, 2022, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details