मुंबई - महाराष्ट्र स्टेट बँक फेडरेशनतर्फे राज मैदान येथे सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी पीएमसी बँकेत ज्याप्रकारे घोटाळा झाला, त्याप्रकारे इतर देखील बँकांमध्ये घोटाळा होऊ नये, थकीत कर्जाची वसुली झाली पाहिजे, बँकांचे एकत्रीकरण हा सरकारचा डाव आहे तो बंद केला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
हेही वाचा -' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा'
त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एक सभा घेतली. त्यात त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली. त्यामध्ये 22 तारखेला देशभर विविध मागण्यांसाठी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.
बँक कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप केंद्र सरकारचा बँक एकत्रीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी देशातून सुमारे चार लाख बँक कर्मचारी एकजुटीने एकत्र येत, येत्या 22 ऑक्टोबरला एक दिवसीय देशव्यापी संप पुकारणार आहेत. बँकेचे एकीकरण धोरण सध्या चालू आहे. हा सरकारचा डाव आहे, नागरिकांनी बँक एकीकरण करण्याची मागणी न करताही सरकार मोठ्या उद्योगांच्या फायद्यासाठी हे एकीकरण करण्याचे धोरण राबवत आहे. हा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व बँक कर्मचारी पुन्हा एकत्र येत लढणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा -पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
2014 ला केंद्रात सरकारला जे मताधिक्य मिळाले, ते पाहून मनात धडकी भरली. बँक एकीकरणानंतर बऱ्याच बँकांच्या शाखा बंद केल्या. हे सरकार गाजर दाखवणारे, नेहमी खोटे बोलणारे आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे आता कर्मचारी संतापले आहेत आणि त्यांच्या पोटावर कुऱ्हाड फिरू नये यासाठी ते येत्या 22 तारखेला एक दिवसीय देशव्यापी संप करणार आहेत, असे तुळजापूरकर यांनी सांगितले.