मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 ऑगस्ट 2020 रोजी सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' मिळावा, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - अण्णाभाऊ साठे न्यूज
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 ऑगस्ट, 2020 रोजी सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी विविधांगी साहित्याद्वारे शोषित-वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडली. मुंबईत असताना त्यांनी कामगार-श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यामध्ये सहभागी होत आपल्या शाहिरीद्वारे मोठी जनजागृती घडवली. 'फकिरा' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेवून केंद्र सरकारकडे अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' मिळण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी शिफारस या पत्रात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.