महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 1, 2021, 9:33 PM IST

ETV Bharat / state

'मोदी सरकार इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार ?'

छोटे, लहान, मध्यम उद्योगांची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे. मनमानी व लहरी निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनामुळे त्यात आणखी भर पडून इतर क्षेत्रालाही अस्तित्व टिकवण्याची धडपड करावी लागत आहे. त्यात भविष्यासाठी केलेल्या बचतीच्या तरतुदीवरही मोदी सरकारची वक्रदृष्टी पडली असून बचतीवरील व्याजदर कमी करून पुन्हा सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले
नाना पटोले

मुंबई - बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचूकीने झाला होता, त्यामुळे मागे घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. नजरचूकीने झालेली चूक १२ तासात सुधारली जाते. मात्र सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, देशभरात मोदी सरकारविरोधात जनमाणसात रोष निर्माण झाला आहे. पाच राज्यातील निवडणूकीत याचा फटका बसू नये, यासाठी तो तात्पुरता निर्णय मागे घेतला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

बचतीच्या तरतुदींवर मोदी सरकारची वक्रदृष्टी
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक निर्णय हा चूकीच्या पद्धतीने घेऊन जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहे. नोटबंदी, जीएसटी, नियोजन न करता लावलेले लॉकडाऊन या मोदी सरकारच्या चूकांमुळे देश अधोगतीकडे गेला आहे. छोटे, लहान, मध्यम उद्योगांची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे. मनमानी व लहरी निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनामुळे त्यात आणखी भर पडून इतर क्षेत्रालाही अस्तित्व टिकवण्याची धडपड करावी लागत आहे. त्यात भविष्यासाठी केलेल्या बचतीच्या तरतुदीवरही मोदी सरकारची वक्रदृष्टी पडली असून बचतीवरील व्याजदर कमी करून पुन्हा सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.


मूठभर उद्योगपतींच्या हिताची जपणूक
बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय नजरचूकीने झाल्याचे मोदी सरकार म्हणत असेल तर मागील सात वर्षापासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढवण्याची जी घोडचूक केली जात आहे ती कधी सुधारणार, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षा दुप्पट असतानाही इंधनाचे दर स्थिर ठेवून जनतेला महागाईच्या झळा पोहचू दिल्या नाहीत. परंतु मोदी सरकारला मात्र अशापद्धतीने जनतेला दिलासा देता आलेला नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे. हे सरकार सामान्य जनतेच्या हितापेक्षा मुठभर उद्योगपतींच्या हिताची जपणूक करणारे आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून अदानीच्या फॉर्च्युनसह इतर कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढवून सर्वसामान्य जनतेची लूट सुरु केली आहे, ती कधी थांबवणार? असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे.

जनतेला दिलासा मिळेल का.?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना मोदी सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करा शिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर ८२० टक्के तर पेट्रोलवर २५८ टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर तर डिझेलचे दर ९० रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. एलपीसी सिलिंडर सुद्धा ८५० रुपयांच्यावर गेले आहे. ही घोडचूक सुधारून सामान्य जनतेला मोदी सरकार दिलासा देईल का?, असा प्रश्न पटोले यांनी विचारला आहे.

हेही वाचा-सामान्यांचा लोकलप्रवास बंद होण्यासह मुंबईत कडक निर्बंधांचे महापौरांचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details