महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; मुंबईतील रस्ते ओस - मुंबई लेटेस्ट कोरोना लॉकडाऊन बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Mumbai Lockdown
मुंबई लॉकडाऊन बातमी

By

Published : Apr 15, 2021, 9:54 AM IST

मुंबई -राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमी व्हावी यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनची मुंबईत कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबईकर राज्य सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी याचा आढावा घेतला.

लॉकडाऊनला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र मुंबईमध्ये आहे

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे सरकारसमोरील आव्हाने वाढत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमवाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. या सर्व बाबीबर नियंत्रण यावे यासाठी 14 एप्रिलला रात्रीच 8 वाजल्यापासून सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 1 मेपर्यंत लागू राहील. परिणामी दादर, अंधेरी, वांद्रे या गजबजलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत. मुंबईत दररोज होणारी रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम
द्रुतगती मार्गावर वाहनांचे प्रमाण रोजच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नागरिकांची गर्दी कमी झाल्यामुळे बेस्टच्या बसेसही रिकाम्या धावताना दिसत आहेत.

जास्त गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद -

कोरोना रूग्णसंख्या कमी होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details