महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Water Reduction : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत पाणीपुरवठ्यात होणार 10 टक्के कपात; कारण काय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 11:12 AM IST

Mumbai Water Reduction : मायानगरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे धरणाच्या न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. त्यामुळं मुबंईच्या अनेक भागात पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात आलीय.

Mumbai Water Reduction
Mumbai Water Reduction

मुंबई Mumbai Water Reduction : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्रातील अनेक भागात जलसंकटाचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे धरणाच्या न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या कामामुळं मुंबई, ठाणे, भिवंडीतील अनेक भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं सोमवार 20 नोव्हेंबर ते शनिवार 2 डिसेंबर 2023 पर्यंत अनेक भागातील पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय.

पाण्याचा वापर काटकसरीनं करावा : या कालावधीत पाणीकपातीच्या एक दिवस अगोदर सर्व नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करण्याबाबत पालिका प्रशासनाच्या वतीनं कळविण्यात येणार आहे. पाणीकपातीच्या काळात सर्वांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. पिसे धरण हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या भातसा तलावातील पाणी साठवतं. मात्र, याची साठवणूक क्षमता कमी आहे. या कामामुळं मुंबई, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांना 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पिसे धरणातून ठाण्यातील अनेक औद्योगिक व निवासी भागांना पाणीपुरवठा होतो.

पाणीपुरवठ्यावर 13 दिवस परिणाम : याबाबत पालिकेने एक निवेदन जारी केलं आहे. पिसे धरणातील न्यूमॅटिक गेट सिस्टममध्ये एअर ब्लॅडर बदलण्याचे काम सोमवार, 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या कामामुळं मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर 13 दिवस परिणाम होणार आहे. याशिवाय ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या अखत्यारीतील अनेक भागातीव पाणीपुरवठ्यालर या काळात परिणाम होणार आहे. गतवर्षी 2022 मध्ये 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या कामात अनेक भागांना जलसंकटाचा सामना करावा लागला होता. भांडुप व्यतिरिक्त पालिकेचं पिसे आणि पंजरपूर ट्रीटमेंट प्लांट आहेत. पिसेमध्ये तीन पंपिंग स्टेशन आहेत, जे सेक्शन प्लांटद्वारे पाणी उचलतात आणि ते पंजरपूरला पाठवतात. इथून पंजरपूर आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर शुद्ध केलेलं पाणी येवई टेकडीवर पाठवले जाते, जिथं मास्टर बॅलन्सिंग जलाशय आहे. हे फिल्टर केलेलं क्लोरीनयुक्त पाणी मुंबईला 2,345 मिमी व्यासाच्या मुख्य लाईन्सद्वारे पुरवलं जातं.

ABOUT THE AUTHOR

...view details