मुंबई- अवयवदानासाठी जनजागृती करुन एक मोठी व्यापक चळवळ तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पाऊल उचचले आहे. अवयव दानाचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जागतिक अवयवदान दिनानिमित्त विद्यापीठाकडून देण्यात आली.
मुंबई विद्यापीठ करणार अवयवदानासाठी जनजागृती; अवयवदानाबद्दल विविध कार्यक्रम राबवणार - जागतिक आरोग्य दिन न्यूज
जागतिक अवयवदान दिनानिमित्त मुंबई विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मुंबई विद्यापीठाने अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
१३ ऑगस्ट या अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अवयव प्रत्यारोपण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य श्रीकांत आपटे यांनी अवयवदानाचे महत्व पटवून दिले. देशासह राज्यात अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतिक्षायादी खूप मोठी आहे. काही रुग्ण उपचाराने काही दिवस जगू शकतात तर काहींना तातडीने अवयव प्रत्यारोपण करणे गरजेचे असते. मात्र, अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, ही भीषण आणि दाहक परिस्थिती बदलण्यासाठी अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत आपटे यांनी व्यक्त केले.
अवयवदानासाठी व्यापक चळवळ सुरु करण्यास विद्यापीठ कटीबद्ध असून एक मिशन म्हणून याचा अंगीकार करुन विद्यापीठ वाटचाल करणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. प्र-कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतात अवयदानाचे प्रमाण खूप कमी आहे. अवयवांच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सद्यपरिस्थितीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी विद्यापीठामार्फत पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.