मुंबई -मुंबई विद्यापीठात कुलगुरूंचे लाखो रुपयांच्या वाहन खरेदीचे प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांच्या दीक्षांत सोहळ्यावर तब्बल ७४ लाख २७ हजार ११६ रूपयांची उधळपट्टी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे हा दीक्षांत सोहळा राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व विद्यापीठांमध्ये महागडा ठरला असून, याविषयी विद्यार्थी संघटनांसह सिनेट सदस्यांनीही यावर आक्षेप घेतले आहेत.
हेही वाचा -'आधार-पॅन' जोडणीची अंतिम मुदत चुकवू नका- प्राप्तिकर विभाग
महागड्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठाने सर्वांधिक खर्च हा कुलगुरूंच्या आग्रहाखातर आणण्यात आलेल्या नवीन ड्रेसकोडवर करण्यात आला आहे. यासोबत स्टेज सजावट, केटरिंग, ध्वनीक्षेपण व्यवस्था, पाहुण्यांच्या ग्रँड हयातमधील राहण्याची व्यवस्था, डिजीटल स्क्रीन आदींवर लाखो रुपये उधळण्यात आली आहेत. वाहतूक व्यवस्थेवर २४ हजार, संगणक व्यवस्थेसाठी १ लाख ५० हजार, डाटा कलेक्शनसाठी १ लाख १८ हजार तर केवळ पगडी साठी १ लाख ८० हजार रुपयांची उधळपट्टी केली असून, यासाठी ॲड. शोमितकुमार साळुंके यांना ही माहिती आधिकारातून माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे म्हणाले की, हा खर्च धक्कादायक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची प्रचंड मोठी वानवा असताना अशा प्रकारे खर्च करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ते आटोक्यात आणण्याची कुलगुरुंची जबादारी होती, असेही डॉ. कोहचाडे म्हणाले.