महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2019, 11:59 PM IST

ETV Bharat / state

मुंबईमधील संरक्षण भिंतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

मुंबईत सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाड दुर्घटना घडली, या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना घडून नयेत, यासाठी मुंबईतील जलायशांच्या संरक्षण भिंतीचे स्टक्चरल ऑडीट करावे. जेणेकरुन अशा घटनांचे नियमित रितीने देखरेख आणि देखभाल झाली पाहिजे, अशा विषयासंदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अहिर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची गुरुवारी भेट घेवून निवेदन दिले.

मालाड

मुंबई - दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलायशाची संरक्षण भिंत पडून यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबईतील जलाशयांच्या संरक्षण भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्याची माहिती, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.

आयुक्तांची भेट घेवून देण्यात आलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर


पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे महापालिकेवर कॅगने ओढलेले ताशेरे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरे पार्किंग, महापालिकेतील औषधांचा तुटवडा, आरोग्य विभागातील तक्रारी, मालाड येथील भिंत कोसळून घडलेली घटना अशा विषयासंदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अहिर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची गुरुवारी भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी आमदार विद्या चव्हाण, पालिका गटनेत्या राखी जाधव, पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.


मुंबईत सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाड दुर्घटना घडली. भविष्यात अशा घटना घडून नयेत, यासाठी मुंबईतील जलायशांच्या संरक्षण भिंतीचे स्टक्चरल ऑडीट करावे. जेणेकरुन अशा घटनांचे नियमित रितीने देखरेख आणि देखभाल झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली. आयुक्तांनी त्याला तत्वत: मान्यता दिल्याचे अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


प्रकल्पबाधितांची उपलब्ध असणारी घरे दुर्घटनाग्रस्तांना द्यावीत. कायमस्वरुपी घरे असतील तर दुर्घटनाग्रस्तांना तीही उपलब्ध करुन त्यांचे तत्काळ स्थलांतर करावे, अशी मागणी केली. आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.


भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळावी. पहिल्याच पावसात रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे. झाडे, पाणी, गटारांचे प्रश्न सातत्याने मांडण्यापेक्षा २१ व्या शतकात मुंबई शहर निर्माण करण्यासाठी आयुक्तांनी अॅक्शन प्लान तयार करायला हवे, त्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, लोकांचा सहभाग करुन घ्यावा, अशा सूचना मांडल्या. कॅगचा अहवाल, पार्किंग पॉलिसी, इतर समस्यांबाबतही सखोल चर्चा झाली. आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देताना, तातडीने दखल घेऊ असे सांगितले.


तसेच परळ, लोअर परळ आणि वरळी आदी ठिकाणच्या गिरण्यांच्या जमिनीतून मिळालेल्या पार्किंग जागा खासगी विकासकांना देण्यापेक्षा मुंबईकरांना मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य करताना तसे आदेश काढून अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील, अशी ग्वाही दिल्याचे अहिर यांनी सांगितले.


पुनर्वसन न झाल्याने दुर्घटना - विद्या चव्हाण


मालाडमधली भिंत पडून जी दुर्घटना झाली ती भयंकर आहे. याला वन विभाग आणि पालिका जबादार असल्याचे आयुक्तांना भेटून सांगितले आहे. जी भिंत बांधण्यात आली ती पाण्याचा मारा सहन करू शकत नव्हती इतकी कमकुवत होती. आमच्या नगरसेविका धनश्री पराडकर आणि त्यांचे पती वैभव पराडकर यांनी त्वरित मदत करून हॉस्पिटलला नेल्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. या ठिकाणच्या नागरिकांचे पुनर्वसन करावे म्हणून गेले २० वर्ष पाठपुरावा करत आहोत. १३ हजार ५०० लोकांचे पुनर्वसन पवई संघर्ष नगर येथे करण्यात आले आहे. मात्र भाजपचे सरकार आल्यावर पुनर्वसनाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. पीएपीच्या रिक्त असलेल्या दीड हजार घरांमध्ये यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्र्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केल्याची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details