मुंबई: मुंबईत सुरु असलेली प्रकल्पकामे, वातावरणात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे हवेची गुणवत्ता ढासळली असून प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक धूर, धुळ आणि धुरक्यातून होत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक ३०९ असा नोंदवण्यात आला आहे. एनएएक्यूएसच्या निर्देशानुसार मुंबईत हवा दुषीत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक प्रदूषणाची नोंद: प्रकल्प कामे, वातावरणातील बदलामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सातत्याने बदलत असतो. वाहनामधून निघणारा धूर, काजळी, धूळ यामुळे हिवाळ्यामध्ये मुंबईत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद होते. नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात कमालीचा बदल झाला आहे. सध्या किमान आणि कमाल तापमान वाढले असले, तरी समुद्री वाऱ्याची गती कमी असल्याने धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.
गुणवत्ता अत्यंत खराब असल्याची नोंद: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील भागामध्ये प्रदूषण वाढले आहे. धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेले धुरके वातावरणात पसरल्याने हवेचा दर्जा ही खालावला आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील 3 दिवसांच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील सुमारे 6 केंद्रांवर प्रति घन मीटरमध्ये अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण (पी.एम. २.५) ३०० पेक्षाही अधिक नोंद झाल्याचे दिसून येत आहे. माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात कमी (३८५ एक्यूआय) आहे. यामध्ये दिल्लीतील ३२९ या हवेच्या तुलनेत हे प्रमाण मुंबईच्या तुलनेने २० ने कमी आहे.
किती असायला पाहिजे हवा गुणवत्ता निर्देशांक?५ ते ५० हवा गुणवत्ता निर्देशांक असेल, तर एकदम स्वच्छ हवा असते. ५१ ते १०० हवेची शुद्धता समाधानकारक असते. १०१ ते २०० हवेची शुद्धता मध्यम २०१ ते ३०० हवेची शुद्धता म्हणजे प्रदूषण व वाईट हवा आहे. तर ३०१ ते ४०० हवेची शुद्धता जास्त वाईट ४०१ ते ५०० हवेची शुद्धता आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक:माझगाव ३८५, चेंबूर ३४७, वांद्रे-कुर्ला संकुल ३२८, मालाड ३२२, कुलाबा ३०५, भांडुप ३००, अंधेरी २२८, बोरिवली २०८, वरळी २०१, नवी मुंबई १६६, (वातावरणातील कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये, स्रोत: सफर)