महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 7, 2020, 12:09 PM IST

ETV Bharat / state

मुंबईकरांची तहान भागवणार 'गारगाई' प्रकल्प, पालिका करणार ३ हजार कोटी खर्च

या प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यापासून धरणाचे बांधकाम यासाठी हा खर्च होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Mumbai municipality
मुंबई महानगरपालिका

मुंबई- मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी महापालिकेने सध्या असलेल्या धरणप्रकल्पात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा हे प्रकल्प महापालिका पुढील काही वर्षात मार्गी लावणार आहे. यापैकी गारगाई प्रकल्पासाठी महापालिका 3 हजार 105 कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी

या प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यापासून धरणाचे बांधकाम यासाठी हा खर्च होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईला सध्या 7 धरणांमधून 3 हजार 750 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. मुंबईत सतत वाढणारी लोकसंख्या, पाणी चोरी यामुळे मुंबईकरांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असतो. भविष्यात मुंबईकरांची पाण्याची गरज पूर्ण करता यावी म्हणून मा. अ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेने समिती गठीत केली होती. चितळे समितीच्या अहवालानुसार 2041 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी 5 हजार 940 दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे आणि 972 मीटर लांबीचे धारण बांधले जाणार आहे.

हेही वाचा - आरे कारशेडला विरोध करणाऱ्यामागे खोट्या एनजीओ कार्यरत - सोमय्या

  • प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 400 कोटी

गारगाई प्रकल्पात 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. त्यापैकी 170 हेक्टर खासगी तर 670 हेक्टर वनक्षेत्र आहे. या प्रकल्पात वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळा, खोदडे, पाचघर आणि फणसगाव तसेच मोखाडे तालुक्यातील आमले या गावातील सुमारे 185 कुटुंबे बाधित होणार आहेत. या गावांपैकी ओगदे, खोडदे हे गावे पूर्णपणे तर उर्वरीत गावे ही अंशत: बाधित होत आहेत. या प्रकल्पबाधित आणि स्वेच्छा पुनर्वसनास तयार 619 लोकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली 450 हेक्टर जागा वाडा मनोर मार्गालगतच्या देवळी गावाजवळ प्रकल्पबाधित लोकांच्या संमतीने निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 395.59 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

  • प्रकल्पाचा खर्च -
  1. धरणाच्या बाधंकामासाठी - 1 हजार 283 कोटी रुपये
  2. वनखात्याकडून परवानगीसाठी येणारा खर्च - 1025.28 कोटी रुपये
  3. 670 हेक्टर बाधित वनक्षेत्राचे मूल्य - 754 कोटी रुपये
  4. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी - 395.59 कोटी रुपये
  5. गारगाई ते मोडकसागर जलबोगद्याचे बांधकाम - 167 कोटी रुपये
  6. पाणलोट विकासासाठी खर्च - 54.18 कोटी रुपये
  7. अभियांत्रिकी कामासाठींच्या सल्ला - 24.35 कोटी रुपये
  8. प्रकल्पासाठी प्राथमिक अभियांत्रिकी सेवा - 15.16 कोटी रुपये
  9. भूसंपादन आणि सर्वेक्षण - 5 कोटी 29 लाख रुपये
  10. प्रकल्पाचा पर्यावरण परिणाम अभ्यास - 2.69 कोटी रुपये
  11. प्रकल्पाचा जैवविविधता अभ्यास अहवाल - 85 लाख रुपये
  12. सविस्तर प्रकल्प अहवाल सल्ला - 4 कोटी रुपये
  13. पर्यावरणीय, वन व पर्यावरण मंत्रालय राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी - 1.71 कोटी रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details