महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Action On Vehicles : मुंबई महापालिकेने जप्त केली बेवारस ७८२ वाहने - महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल

महानगरपालिका प्रशासनाने (Mumbai Municipal Corporation) रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेली वाहने (unclaimed vehicles) उचलून नेण्याची कार्यवाही धडाक्यात सुरु केली आहे. गेल्या आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने (confiscated 782 unclaimed vehicles) जप्त केली आहेत.

Action On Vehicles
वाहनांवर कारवाई

By

Published : Mar 18, 2022, 6:57 PM IST

मुंबई: कोविड विषाणू प्रसाराच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे नागरी सेवा-सुविधांशी संबंधित दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त कोविड व्यवस्थापनाचे अतिरिक्त कामकाज असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कोविड कालावधीत रस्त्यांच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांवरील कारवाई करण्याचे कामकाज महापालिकेकडून वाहतूक पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

कोविडचा प्रसार कमी झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Municipal Commissioner Dr. Iqbal Singh Chahal) यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला व इतरत्र बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कारवाई करणे, सदर कारवाईसाठी समन्वय साधणे तसेच या कामकाजामध्ये असलेल्या अडीअडचणी इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उचलून नेलेली बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. चर्चेअंती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले होते की, बेवारस वाहने उचलून नेण्याबाबतची कार्यवाही वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवावी. त्यासाठी पोलिसांकडे असलेली टोईंग वाहने महानगरपालिकेकडे सुपूर्द करावीत.

या बैठकीनंतर उपआयुक्त चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने आठवडाभरात सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून आतापर्यंत २ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीस बजावली आहे. पैकी ३७९ वाहनधारकांनी आपली वाहने स्वतःहून हटवली आहेत. तर ३१४ दुचाकी, २८६ तीनचाकी आणि १८२ चारचाकी अशी एकूण ७८२ वाहने महानगरपालिका प्रशासनाने जप्त करून नेली आहेत.

विहित मुदतीत मध्ये प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव केला जाणार आहे. नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत वाहने सोडू नयेत आणि ज्यांची वाहने जप्त केली आहेत त्यांनी नोटिस मधील सुचनेनुसार प्रक्रिया पूर्ण करून, आवश्यक दंड भरून वाहने घेवून जावीत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details