महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 14, 2021, 6:54 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका; पालिकेचे बहुमजली पार्किंग सुरू

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने स्वतःचे बहुमजली पार्किंग सुरु केले आहे. तसेच ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ स्थापन केले आहे.

मुंबई पार्किंग
मुंबई पार्किंग

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. या मुंबईत लाखो वाहने रस्त्यावर धावत असतात. तसेच हजारो वाहने रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने स्वतःचे बहुमजली पार्किंग सुरु केले आहे. बेवारस रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या जप्त करून ठेवता याव्यात यासाठी तीन ठिकाणी जागा निश्चित केल्या जात आहेत. तसेच ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ स्थापन केले आहे. त्याद्वारे स्थानिक पातळीवर समस्या समजून त्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच इमारतींचा पुनर्विकास करताना वाहन पार्किंगची सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात, अशा सूचना बिल्डरांना देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पालिकेची वाहनतळे, स्ट्रीट पार्किंग -

मुंबईत नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. मुंबईत सुमारे २० लाखांहून अधिक वाहने आहेत. रस्ते मार्गाने मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागतो. मुंबईमधील बहुतेक ठिकाणी रस्त्यावर मिळेल त्या जागेवर वाहने पार्किंग केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या मुंबईत गंभीर झाली आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने बिल्डरांकडून मिळालेल्या 29 भूखंडांवर बहुमजली पार्किंग व्यवस्था सुरु केली आहे. या ठिकाणी सुमारे ३० हजार वाहने उभी करता येऊ शकतात. या पार्किंगच्या परिसरात बेकायदेशीर वाहने पार्किंग केल्यास त्यावर १ ते १० हजार रुपयांचा दंड आकाराला जातो. मात्र, याला स्थानिक नागरिकांचा विरोध झाला होता. यामुळे पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या जुन्या इमारतीत पार्किंग नसलेल्या रहिवाशांना स्ट्रीट पार्किंग योजनेखाली जास्तीत जास्त सहा महिन्यांचा सशुल्क पास देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रहिवाशांना सहा महिन्यांचे डिपॉझिट भरणे बंधनकारक आहे.

गाडीच्या सुरक्षेची जबाबदारी वाहन मालकाची

डिपॉझिट जमा केल्यावर रहिवाशांना त्यांच्या गाडीचा क्रमांक असलेला पास देण्यात येणार आहे. अशा रहिवाशांना पालिकेने त्यांच्या इमारतीजवळ निश्चित केलेल्या जागेवर गाडी पार्क करता येणार आहे. या गाड्या रस्त्याच्या एकाच बाजूला उभ्या करता येणार आहेत. मात्र, अशा पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या गाडीच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही वाहन मालकाची असणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ स्थापन -

मुंबई महापालिकेने ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ (एमपीए) स्थापन केले आहे. त्या माध्यमातून वाहनतळ विकेंद्रीकरण साधण्यासाठी निर्णय घेतला आहे. पालिका स्तरावर मुंबईत २२७ विभाग आहेत. त्यात गाड्या पार्किंग करण्यासाठी उपलब्ध जागा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, हे पाहिले जाईल. त्यात दुचाकी तिनचाकी, चारचाकी, बस, छोटी-मोठी खासगी-सार्वजनिक वाहने यांचा समावेश आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र वाहनतळ प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी डॉ. रामनाथ झा हे आहेत. आपण स्वतः प्राधिकरणाचे प्रमुख असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

स्थानिक पातळीवर गरज ओळखून वाहनतळ -

वाहनतळ व्यवस्था अधिक पारदर्शक होण्यासाठी गाड्या उभ्या करण्यासाठी ऑनलाईन आरक्षणाचीही व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, सध्याच्या धोरणात बदल करुन स्थानिक पातळीवरील वाहनांची गरज ओळखून वाहनतळ उभारले जावे, असाही विचार राहणार आहे. त्या ठिकाणी प्रवाशांना पिकअप-ड्रॉप सुविधा, सामानाच्या चढ-उतारासह गॅरेज आदींच्या दृष्टीने वाहनतळ उभारण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवरील पालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

माेबाईल अ‍ॅपद्वारे पार्किंग -

पालिकेने याप्रकारे वाहनतळ निर्मिती करता येईल, अशा जागा निश्‍चित करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती केली आहे. मुख्य म्हणजे बहुमजली पार्किंगप्रमाणेच रस्त्यावर गाड्या उभ्या करण्यासाठीही जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. त्या जागा ठरल्यानंतर तिथे मोबाईल अ‍ॅपवरून पार्किंगसाठी जागा उपलब्ध केली जाईल. रिक्षा-टॅक्‍सी चालकांना माफक दरात वाहनतळात पार्किंग व्यवस्था केली जाईल. सर्व प्राधिकरणाच्या मालकीचे वाहनतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीत येईल. स्थानिकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही वेलारासू यांनी स्पष्ट केले.

बेवारस गाड्यांसाठी व्यवस्था -
मुंबईत हजारो बेवारस वाहने रस्त्यांवर उभी असतात. पालिकेस ही वाहने जप्त करण्याचा अधिकार असला तरीही त्या गाड्या ठेवण्यासाठी जागा नाही. म्हणून, गोवंडी देवनारमध्ये दोन आणि वांद्रे पूर्व येथे तशी जागा निवडली जाईल. या जागेचे क्षेत्रफळ प्रत्येकी १० हजार चौरस मीटर इतके असेल.

बस डेपोमध्ये पार्किंग -

पालिका क्षेत्रात सुमारे ३ हजार ५०० खाजगी बस गाड्या आहेत. यातील बहुतेक बस गाड्या मुंबईतील रस्त्यांवर 'पार्क' केल्या जातात. मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या रस्त्यांलगत उभ्या राहितात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्याचवेळी या बसगाड्या महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या वाहनतळांवर किंवा बेस्ट बस डेपोंमध्ये 'पार्क' केल्यास वाहतूक सुरळीत व वेगवान होण्यासाठी त्याची मोठी मदत होऊ शकते. यासाठी बस डेपोमध्ये पार्किंग व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. बेस्ट बस डेपोंमध्ये शालेय बसेसच्या पार्किंग दरात कपात करण्यात आली आहे.

हेही वाचा -विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details