मुंबई -एमपीएससीने मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे कुणी जाणीवपूर्वक केले आहे की, काही वेगळ्या विचारांनी केले आहे हे लवकरच समोर येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एमपीएससीने मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यासंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुख्य सचिवांना माहिती द्यायला हवी होती -
एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. या संदर्भात मुख्य सचिवांना ज्याकाही सूचना करायच्या होत्या, त्या केलेल्या आहेत. परंतु एमपीएससी प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. एमपीएससी ही स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहे त्याबद्दल दुमत नाही. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा विषय सुरू आहे. त्यामुळे साधारण या विचारापासून बाजुला जाण्याचा प्रयत्न इतरांनी करु नये. तसेच एमपीएससीने मुख्य सचिवांना याबाबत माहिती द्यायला हवी होती, असेही ते म्हणाले.