महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: माय-लेकाच्या अपहरणाचे गुढ उकलले, पाच जणांच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर

चेंबूरमध्ये आई आणि मुलाचे मालमत्तेसाठी अपहरण करून मुलाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सात जणांच्या एका टोळीने दोघांची मालमत्ता हडप करण्यासाठी हे कृत्य केले आहे. यामध्ये पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे. मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह अहमदाबाद येथे फेकण्यात आला होता. तर आईला एका इमारतीमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. चेंबूर पोलिसांनी गुजरात येथे जाऊन महिलेची सुखरूप सुटका केली आहे.

By

Published : May 4, 2023, 9:00 AM IST

Mumbai Crime News
मालमत्तेसाठी अपहरण

मुंबई : मालमत्ता हडप करुन त्याची विक्री करत बक्कळ पैसा कमावण्याच्या हेतूने सात जणांनी मिळून चेंबूरमधील ८० वर्षीय वयोवृद्ध मातेसह तिच्या ४४ वर्षीय मुलाचे अपहरण केले. नंतर मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यातून वृद्ध मातेची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघेजण बेपत्ता झाल्याच्या पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरुन चेंबूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने अपहरण : पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल ते २ मे या कालावधीत हा गुन्हा घडला. चेंबूरमधील रहिवासी रोहीणी कांबळे आणि त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार रोहीणी यांच्या बहिणीने २१ एप्रिलला चेंबूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळांवरील सीसीटिव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुरावे यांच्याआधारे तपास सुरु केला. तपासात धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. त्यानुसार, पोलिसांनी वडाळा आणि पवईतून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या चाैकशीतून पोलिसांनी कडी सोडवत या मिसिंग मिस्ट्रीचा उलगडा केला. यातील आरोपींनी मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने विशाल आणि रोहीणी यांचे अपहरण केल्याचे उघड झाले.


मिसिंग मिस्ट्रीचा उलगडा :मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी आरोपींनी ५ एप्रिलला विशाल आणि रोहीणी यांना पनवेलमधील एका बंगल्यावर बोलावून घेतले. तेथे, त्यांनी सुरुवातीला या दोघांना गुंगीचे औषध पाजले. आरोपींनी या बंगल्यावरच विशालची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी विशालचा मृतदेह वडोदरा-अहमदाबाद महामार्गाच्याकडेला फेकून दिला. तर, सह्या, अंगठ्याचे ठसे घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी रोहीणी यांना जिवंत ठेवले होते. आरोपींनी त्यांना सुरुवातीला राजस्थानमधील अजमेर येथे नेऊन डांबून ठेवले. पूढे त्यांना मुंबईत आणून गोरेगावातील आरे मिल्क काॅलनीमध्ये डांबून ठेवल्याचे समोर आले.


योजनाबद्ध रितीने छापेमारी :चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी सरकारतर्फे तक्रार दाखल करुन हत्येच्या भादंवि कलम ३०२ सह १२० (ब), २०१, ३२८, ३४६, ३४७ आणि ३६४ अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला. रोहीणी यांंना जेथे डांबून ठेवले आहे. तेथे दोघेजण त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रोहीणी यांच्या जिवाला धोका असल्याने पोलिसांनी योजनाबद्ध रितीने येथे छापेमारी करुन रोहीणी यांची सुखरुप सुटका केली. गुंगीचे औषध दिले असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : Thane Crime: अनैतिक संबंधात अडसर पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा

ABOUT THE AUTHOR

...view details