मुंबई - कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही निर्बंध कायम आहेत. यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी आणि मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये प्रवेशबंदी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरु केली जावी, अशी मागणी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच; परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलनही सुरू करेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
निर्बंध नक्की कोणासाठी?
गेल्या १५ महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निबंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्यात्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, ते तर अनाकलनीय आहेत. मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरु आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागत आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत.
बस सुरु आणि लोकल बंद
महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे 'बस सुरु आणि लोकल बंद' यातून नेमके काय साध्य होणार? ही साथ एकाएकी जाणार नाही, असे जगातल्या तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे. त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहेच, परंतु, त्यासोबतच धोरणात आखणी कल्पकता दाखवायला हवी. पण महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही, असे चित्र दिसत आहे.
'माझा पक्ष मुंबईकरांसोबत'