महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंघोळ आणि लघुशंका केल्यानंतर वाया जाणारे पाणी वाचवणेही आपले कर्तव्य - अमिताभ बच्चन - water conservation

पाण्याची बचत आणि संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'मिशन पानी' या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी मुंबईत करण्यात आले. यावेळी, महानायक अमिताभ बच्चन, केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. तर, मुख्यमंत्री फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

अमिताभ बच्चन

By

Published : Aug 28, 2019, 3:01 AM IST

मुंबई - पाणी बचतीसाठी सर्वसामान्य माणूस नक्की काय करू शकतो? असा विचार नेहमी केला जातो. पण, शॉवर लावून अंघोळ करताना साबण लावताना तो शॉवर बंद करणे. तसेच, लघुशंका केल्यावर लागेल तेवढंच पाणी वापरूनदेखील आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व पाळू शकतो असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. नेटवर्क 18, अमिताभ बच्चन आणि हार्पिक कंपनीने संयुक्तरित्या सुरू केलेल्या 'मिशन पानी' या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अंघोळ आणि लघुशंका केल्यानंतर वाया जाणारे पाणी वाचवणेही आपले कर्तव्य - अमिताभ बच्चन


दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत असून कुठे दुष्काळ तर कुठे पूर परिस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी, पाण्याची बचत आणि संवर्धन करण्यावर सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत अमिताभ यांनी व्यक्त केले. मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी हे सहभागी झाले होते. तर, केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
बच्चन यांनी यावेळी बोलताना पाण्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असले तरीही त्यासाठी एकत्रितपणे पुढे येणे गरजेचे असल्याचे म्हणाले. प्रत्येकाने स्वयंशिस्त लावण्यासोबतच जे लोक या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत त्यांचे कार्य लोकांसमोर येण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच, आपल्या लहानपणी पाणी विकत घेऊन ते साठवावे लागेल असं कुणी सांगितलं तर हसू यायचे मात्र, आज ते वास्तव असल्याने खेद वाटत असलाचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.


राज्यराज्यातले तंटे पाणी संवर्धनातला मोठा अडथळा - गडकरी


पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याची ओरड अनाठायी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मात्र, पावसाचे पाणी अडवण्यात आपण असमर्थ ठरत असल्याने पाण्याचा तुटवडा होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात यांच्यातील पाणीवाटपाचे तंटे, छत्तीसगड, ओडिशा असो किंवा उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशातील पाण्याचे वाद असो आपण ते चर्चेने सोडवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले. तसेच, आत्तापर्यंत पाण्याच्या बाबतीत 9 तंटे सोडवण्यात यशस्वी झालो असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अनेकदा राज्य स्वतः ते पाणी वापरत नाही आणि दुसऱ्याला वापरूही देत नाही त्यामुळे पाणी समुद्रात मिसळून वाया जाते. हे चित्र बदलत नाही तोपर्यंत पाण्याची उपलब्धता करून देता येणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यात 19 हजार गाव करतात वॉटर बजेटिंग - फडणवीस


राज्यात शहरी भागात पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्याचा मार्ग अवलंबला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय 'जलशिवार योजना' आणि इतर योजनांच्या माध्यमातून दीड लाख शेततळी उभारली असून 19 हजार गावाचं वॉटर बजेटिंग करण्यात आलं असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी संवर्धन ही राज्याची प्राथमिकता असून त्यासोबत दुष्काळ संपवण्यासाठी कॅनलद्वारे नदीजोड प्रकल्प राबवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात रेन वॉटर हार्वेस्टिंग सहित ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिल्याचे सांगितले. तसेच हॅन्डपंपमधून गळणारे पाणी साठवून ते गुरं आणि शेतीच्या इतर कामांसाठी वापरणे बंधनकारक केले असल्याचेही म्हणाले.


जग्गी वासुदेव यांनी कावेरी नदीवर 'रॅली ऑफ रिव्हर्स'च्या माध्यमातून केलेल्या कामाचा दाखला देताना, समुद्रात जाणारे सरसकट सर्व पाणी अडवण्याची गरज नसल्याचे सांगितले. एकूण पाण्याच्या 25 टक्के पाणी समुद्रात मिसळले नाही तर, काही वर्षांनी त्याचे विपरीत परिणाम दिसतील. त्यामुळे, जे काही करायचे असेल ते निसर्गाचा समतोल राखून करावे लागेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details