महाराष्ट्र

maharashtra

आज..आत्ता.. रात्री १२ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jul 2, 2019, 11:56 PM IST

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून विधानपरिषदेत तब्बल २० विधेयके मंजूर करण्यात आली, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ‘ईव्हीएम्’ यंत्राऐवजी ‘बॅलेट पेपर’ द्वारे घेण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. एवढेच नाहीतर मुंबईत पावसामुळे एका दिवसात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने बांगलादेशाविरोधातील सामना २८ धावांनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जालन्यात गटविकास अधिकाऱ्याने विहिरींच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांकडून साडेतीन कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप भाजप जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके यांनी स्थायीच्या बैठकीत केला.

महत्वाच्या घडामोडी

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; विधानपरिषदेत तब्बल २० विधेयके मंजूर

मुंबई - राज्य विधानमंडळाच्या १७ जून पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानपरिषदेत १७ जून ते २ जुलै २०१९ या काळात विधान परिषदेच्या एकूण १२ बैठका झाल्या. त्यात प्रत्यक्षात ६८ तास ७ मिनिटे कामकाज झाले. विविध कारणांमुळे १२ तास १४ मिनिटे वाया गेली. रोजचे सरासरी ५ तास ४० मिनिटे कामकाज झाले. यात २ हजार ८२५ तारांकित प्रश्न आले. त्यातील ९७२ प्रश्न स्वीकारले गेले. तर ३७ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. वाचा सविस्तर...

घातवार...मुंबई बनली 'तुंबई'; पावसामुळे एका दिवसात २६ जणांचा मृत्यू

मुंबई - गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्र रूप धारण केले. रात्री ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढावी लागली. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत विविध घटनांमध्ये तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...

विधानसभेचे मतदान ‘ईव्हीएम्’ ऐवजी ‘बॅलेट पेपर’द्वारे घ्या; धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई - राज्यात लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान ‘ईव्हीएम्’ यंत्राऐवजी ‘बॅलेट पेपर’ द्वारे घेण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. विधानमंडळाच्या नियम २३ अंतर्गत त्यांनी याविषयी अशासकीय ठराव मांडून त्यासाठीची मागणी सरकारकडे केली. त्यावर सभापतींनी हा ठराव स्वीकारत असल्याचे सांगत याविषयीची शिफारस सरकारकडे केली जाईल असे स्पष्ट आश्वासन सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.वाचा सविस्तर...

CWC IND VS BAN : बांगलादेशी वाघांची शिकार करुन भारत उपांत्य फेरीत

बर्मिंगहॅम- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे ३१५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशने सर्वबाद २८६ धावा केल्या. भारताने हा सामना २८ धावांनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेशकडून साकिब अल हसन आणि मोहम्मद सैफूद्दीन याने अर्धशतकी खेळी केली. मात्र, तेही आपल्या संघाचा पराभव वाचवू शकले नाही. जसप्रीत बुमराह याने ४ विकेट घेत बांगलादेशच्या विजयाची स्वप्न धुळीस मिळवले. वाचा सविस्तर...

'गटविकास अधिकाऱ्याकडून साडेतीन कोटीचा घोटाळा, अधिकारी-पदाधिकाऱ्यांना वाटली खिरापत'
जालना - गटविकास अधिकाऱ्याने विहिरींच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांकडून साडेतीन कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप भाजप जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके यांनी स्थायीच्या बैठकीत केला. या रकमेत अधिकाऱ्यांनाही वाटा देऊन बदली करून घेतल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या आरोपाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details