महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2020, 2:54 PM IST

ETV Bharat / state

म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला मुख्य अधिकारीच नाही!

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ज्या म्हाडा(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण)च्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर आहे त्या मंडळाचा कारभारच मुख्य अधिकाऱ्याशिवाय सुरू आहे. अतिशय महत्त्वाचे असलेले हे पद मागील महिन्याभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय रखडत असून हे पद त्वरित भरले जावे, अशी मागणी होत आहे.

MHADA
म्हाडा

मुंबई -गुरुवारी दुपारी सीएसएमटी येथील भानुशाली इमारतीचा 60 टक्के भाग कोसळला. या दुर्घटनेत 9 जणांचा बळी गेला. या घटनेनंतर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर टीका होत आहे. मुंबईतील 16 हजार धोकादायक इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ज्या म्हाडा(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण)च्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर आहे त्या मंडळाचा कारभारच मुख्य अधिकाऱ्याशिवाय सुरू आहे. अतिशय महत्त्वाचे असलेले हे पद मागील महिन्याभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय रखडत असून हे पद त्वरित भरले जावे, अशी मागणी होत आहे.

म्हाडाच्या प्रत्येक मंडळाचा प्रमुख हा मुख्य अधिकारी असतो. त्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु गेल्या महिन्याभरापासून दुरुस्ती मंडळाला मुख्य अधिकारीच नाही, असे चित्र आहे. गेल्या महिन्यात 9 जूनला तत्कालीन मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा(एसआरए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीने रिक्त झालेले पद भरणे आवश्यक होते, मात्र, हे पद अजूनही रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार सहमुख्य अधिकारी अनिल अंकलगी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दुरुस्ती मंडळ हे 16 हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असताना राज्य सरकारने अजूनही हे पद रिक्त ठेवल्याबद्दल ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

इमारतींच्या दुरुस्ती-पुनर्विकासाला परवानगी देण्यासह मास्टर लिस्टची प्रक्रिया पार पाडणे, रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवणे, असे एक ना अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्य अधिकाऱ्यांमार्फत घेतले जातात. त्यामुळे लवकरात लवकर हे पद भरावे. एका आयएएअ अधिकाऱयाची मुख्य अधिकारी म्हणून पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पेठे यांनी केली आहे. या पदावर रामस्वामी यांच्यानंतर एकही धडाडीचा अधिकारी आला नाही. रामस्वामी या पदावर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, अल्पावधीतच पदोन्नतीच्या नावाखाली त्यांची बदली करण्यात आल्याचेही पेठे म्हणाले.

काही महिन्यांपूर्वीच सतीश लोखंडे या पदावर आले होते. अनेक विषय समजून घेत कामाची सुरुवात करण्या अगोदरच त्यांची गेल्या महिन्यात बदली करण्यात आली. त्यानंतर हे पद रिक्त आहे. भानुशालीच्या दुर्घटनेनंतर तरी सरकारने जागे व्हावे आणि हे पद त्वरित भरावे, असे पेठे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details