महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 20, 2020, 5:27 PM IST

ETV Bharat / state

आरक्षणाला साथ न देणाऱ्या मराठा आमदार-खासदारांना घरी बसवू; मराठा आंदोलकांचा इशारा

मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून मुंबईत 18 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यात आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच, मराठा समाजाला नेतृत्व नाही. त्यामुळे यापुढे जो मराठा आमदार आणि खासदार आम्हाला पाठिंबा देणार नाही त्याला आम्ही घरी बसवू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

मराठा आंदोलकांचा इशारा
मराठा आंदोलकांचा इशारा

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. ही स्थगिती हटवावी, यासाठी मराठा बांधवानी मुंबईत 18 ठिकाणी आंदोलन केले. जे मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणाला साथ देणार नाही, अशा आमदार खासदारांना येत्या निवडणुकीत घरी बसवू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलकांनी दिला आहे.

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात मूकमोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले. त्याची अंमलबजावणी सुरू असतानाच या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण सध्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा निराशा झाल्यामुळे मराठा समाज संताप व्यक्त करत आहे.

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. याबाबत मराठा आंदोलकानी आंबेडकर यांचे मत योग्य आहे असे सांगितले. मराठा आरक्षणाची आक्रमक बाजू हे आमदार विधानसभेतलावून धरताना दिसत नाहीत. मराठा आमदारांची संख्या जरी मोठी असली तरी ते स्वार्थी आहेत. स्वतःच्या 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा जमा करून ठेवण्याच्या पाठी ते लागले आहेत. त्यांना समाजाचे काही पडलेले नाही. त्यांना समाजाच्या भविष्याचा विचार असता तर, आज आंदोलन करावे लागले नसते, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. मराठा समाजाला नेतृत्व नाही. त्यामुळे यापुढे जो मराठा आमदार आणि खासदार आम्हाला पाठिंबा देणार नाही, त्याला आम्ही घरी बसवू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

आज मुंबईत दादर, परेल, लालबाग, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, दहिसर आदी 18 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने योग्य प्रकारे बाजू मांडावी. आधी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा नंतरच पोलीस भरती करावी, शिक्षणात आरक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

हेही वाचा -पोलिसांच्या नोटीसनंतरही मनसे रेल्वे आंदोलनावर ठाम, उद्या करणार 'सविनय कायदेभंग'

ABOUT THE AUTHOR

...view details