मुंबई- देशभरात एनआरसी आणि सीएए कायद्यावरून वाद सुरू झाला आहे. हा वाद आता मुंबई महापालिकेपर्यंत पोहचला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप आणि महाविकास आघाडीमधील नगरसेवक आमनेसामने आल्याने शाब्दिक खडाजंगी झाली. या खडाजंगी दरम्यान शिवसेनेने मात्र तटस्थ भूमिका घेतली.
भाजप अन् महाविकास आघाडी आमनेसामने हेही वाचा- ढासळलेल्या रुग्णव्यवस्थेला बळकट करण्याची गरज - शरद पवार
अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी
एनआरसी आणि सीएए कायद्यावरून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे जन्म दाखले बनवण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात गर्दी झाली आहे. पालिकेकडे रेकॉर्ड नसल्याने जन्म दाखले बनवण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे पालिकेने दाखले बनवण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. पालिकेच्या विभाग कार्यालयात जन्म नोंदणीचे रेकॉर्ड नसल्याने नागरिकांना सतत फेऱ्या माराव्या लागत आहेत. पालिकेकडे डिजिटल रेकॉर्ड नाही त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालिकेने त्वरित जन्म प्रमाणपत्र बनवून द्यावीत, तसेच इतर सर्व प्रमाणपत्र डिजिटल करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
शाब्दिक खडाजंगी
रईस शेख यांच्या मागणीला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, काँग्रेसचे आसिफ झकेरिया, जावेद जुनेजा यांनी पाठिंबा दिला. तर, जन्म व इतर दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत हे सत्य आहे. मात्र, त्याचा केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याशी कोणताही संबंध नसल्याचे भाजपच्या नगरसेविका ज्योती आळवणी आणि राजश्री शिरवडकर यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाचे नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. या खडाजंगी दरम्यान शिवसेनेने मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.