मुंबई :कर्नाटक राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये एकता कायम होती. निवडणूक लागण्यापूर्वी पासूनच वर्षभर काँग्रेसने भाजपा विरोधात मिशन राबविले. देशातील प्रश्नांवर भर न देता कर्नाटकतील स्थानिक लोकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. निवडणुकीत त्याच मुद्द्यांवर मते मागितली. गाव पातळीपासून राज्य पातळी पर्यंत भाजपा सरकारचा भ्रष्टाचार जनतेपुढे आणला. भाजप विरोधामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली. दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने घेऊन काँग्रेस कार्यकर्ता जागृत ठेवला गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू दिली नाही. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यात एकी कायम होती त्याचाच प्रत्यय म्हणून शनिवारी कर्नाटक मुख्यमंत्री पदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली.
कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबईसह देशभरात :मुंबई पालिकेतील निवडणुकी संदर्भात भाजपने केलेल्या सर्वेत 50 जागा हारत असल्याची माहिती समोर आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यप्रणालीला राज्यातील आणि मुंबईतील लोक नाकारतील अशी अपेक्षा मला आहे. मुंबई महापालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा असेल असे ते म्हणाले.
कर्नाटकमध्ये भाजपला धोबीपछाड करून काँग्रेस सत्तेत बसली आहे. अशाच प्रकारचा भाजपा विरोधात देशभरात येत्या काळात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर घेतल्या पाहिजे. भारतीय जनता पार्टी स्वतःच घाबरलेली आहे. म्हणुन मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलत आहे - क्लाईड क्रास्टो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते