महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसात दुसऱ्यांदा दिल्ली दरबारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री दिल्ली गाठल्याने राज्यात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा तिसऱ्या दिवसातील दुसरा दिल्ली दौरा आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने या नाराजीत भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

By

Published : Jul 22, 2023, 9:04 AM IST

Updated : Jul 22, 2023, 2:21 PM IST

Maharashtra Political Crisis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा नसताना शुक्रवारी रात्री अचानक ते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला आठवडा संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे रात्री दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आपल्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांची भेट घेतली. यावेळी इर्शाळवाडी अपघातातील पीडितांच्या पुनर्वसनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यापूर्वी एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत :मंगळवारी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी 18 जुलैला एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. बैठकीनंतर एकनाथ शिंदे तिथून बाहेर पडले. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक पार पडली होती. या बैठकीवरून शिंदे गटामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडूनच दिल्लीत बोलावल्याची चर्चा सुरू आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा झेंडा :वर्षभरापासून शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच मागून येत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी त्यांच्यासह 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथही दिली. त्यासह अजित पवार यांनी महत्त्वाची खाती सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले. महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून ते संपल्यानंतर तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे होत आहे.

शिंदे गटाचे आमदार अजित पवार गटामुळे नाराज :अगोदरच वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे आमदार अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाने अधिकच नाराज झाले आहेत. अजित पवारांच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने हा प्रकार म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांसाठी आगीत तेल टाकण्यासारखा आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही झाले आहेत. दिल्लीवरून येताना पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते भाजप पक्षश्रेष्ठीकडून हिरवा झेंडा घेऊनच येतील असे सांगितले जात आहे.

हेही वाचा -

  1. NDA Meeting : NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना पहिल्या रांगेत स्थान, मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ
  2. CM Eknath Shinde : नवीन मित्र आल्यानंतर थोडी कुजबुज होते, मात्र....: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Last Updated : Jul 22, 2023, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details