महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 11, 2021, 9:48 AM IST

ETV Bharat / state

महाराष्ट्रात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव.. परभणीत ८०० कोंबड्या दगावल्या, मु्ख्यमंत्री घेणार आढावा

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्रात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव.
महाराष्ट्रात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव.

मुंबई - कोरोनाचे संकट कायम असतानाच देशात सध्या बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकर आणि कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. महाराष्ट्रातही बर्ड फ्लू या महामारीने शिरकाव केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यूपी, केरळ, राजस्थान, एमपी, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात नंतर महाराष्ट्र आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालेले आठवे राज्य ठरले आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे संकट ओढावल्याचे स्पष्ट झाले असून या ठिकाणी तब्बल 800 कोबड्या मरण पावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता बर्ड फ्ल्यूच्या दृष्टीने आढावा बैठक घेणार आहेत.

राज्यात नागपूर, मुंबई, लातूर या जिल्ह्यात ही कावळे, पोपट, कोबंड्या, बगळे या पक्षांचा अचानक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यानंतर या पक्षांचे मृत्यू कोणत्या कारणामुळे झाले याची तपासणी करण्या करिता नमुने भोपाळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान परभणीमधील मृत कोंबड्यांच्या अहवाल हा बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट करत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुरुंबा गावात 8 हजार कोंबड्या; सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश -

मुरुंबा या गावात आठ पोल्ट्री फार्म असून त्यामध्ये आठ हजार कोंबड्या आहेत. चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवसात 800 कोंबड्यांच्या अचानक मृत्यू झाला. याशिवाय गावातील अन्य पक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. तसेच परभणी शहरातील नारायण चाळ परिसरात देखील तीन कोंबड्या अज्ञात आजाराने मरण पावल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तात्काळ पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टरांनी मुरुंबा गावात तळ ठोकून गावातील सर्व पक्षांचे त्यांनी नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्व गावकऱ्यांची होणार तपासणी -

कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता हा आजार गावकऱ्यांच्या माध्यमातून पसरू नये म्हणून तत्काळ मुरुंबा आणि परिसरातील दहा किलोमीटरच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत. तसेच आता जिल्ह्यात बाहेर राज्यतून कोंबड्या खरेदी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

नागपुरात पक्ष्यांचा मृत्यू-

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरातील रिंगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकडोह, आंगेवाडा शिवारात काही दिवसांपासून पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शेतातील झाडाखाली शनिवारी मोठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळून आले. या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परिक्षण अहवाल आला की नेमके कारण स्पष्ट होईल शी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी दिली. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार बर्ड फ्ल्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील टाटानगर वसाहतीत कावळे आढळले मृतावस्थेत-

टाटानगर वसाहतीत आज नऊ कावळे मृतावस्थेत आढळले. देशातील बर्ड फ्ल्यूचा धोका पाहता या कावळ्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवल्याची माहिती सहायक पशु तज्ञ राजेश चातुर यांनी दिली. चेंबूर येथील वाशीनाका परिसरात विविध रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यामधून धूर आणि विषारी वायू बाहेर पडत असल्याने चेंबूर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. याचे वाईट परिणाम नागरिकांच्या आणि प्राणी-पक्ष्यांच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहेत.

लातूरात कोंबड्या दगावल्या-

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील 350 कोंबड्या शनिवारी अचानक दगावल्या आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. एकीकडे 'बर्ड फ्लू'ची साथ आली असतानाच अशाप्रकारे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?

बर्ड फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू असून या आजाराची सुरुवात 1997 मध्ये हाँगकाँग येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये झाली होती. तेव्हापासून हा आजार जगाची पाठ काही सोडताना दिसत नाही. एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा व्हायरस (H5N1) या विषाणूमुळे हा आजार पक्षांमध्ये होतो. तर, या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षांच्या संपर्कात आल्यास मानवाला याचा संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.

असे होते संक्रमण

पक्षांना, त्यातही कोंबड्यांना नैसर्गिकरित्या या विषाणूचा संसर्ग होतो. या आजारात कोंबडी, पक्षी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. तर, हा आजार झालेल्या कोंबड्यांच्या-पक्षांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मल, अनुनासिक स्त्राव, तोंडातील लाळ आणि डोळ्यातील पाणी याद्वारे मानवाला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details