मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना सभागृहात घेरण्याचा प्रयत्न केला. जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. परंतु हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम आहे. दुबार तिबार पेरणीचे संकट आल्यास, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आराखडा तयार केल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुबार पेरणीची वेळ :राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख आहे. मात्र केवळ ६८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५० टक्क्यापर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. कोकण विभागात केवळ १६.३० टक्के तर पुणे विभागात केवळ ३० टक्के पेरणी झाली आहे. अनेक भागात पाऊस नसल्याने पेरणीला वेग आलेलाच नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नाही. सोयाबीन, कपाशी व मक्याची पिके जळून दुबार पेरणीची वेळ आली आहे. खानदेश, बुलडाणा व वाशिम, परभणी, हिंगोली औरंगाबाद तसेच नगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे.
मागणी फेटाळून लावली: दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नावर चर्चा करणे अपेक्षित असताना, सरकार मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यातच व्यग्र आहे. त्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या दारात सरकार कधी जाणार? शेतकऱ्याचे संकट कधी समजून घेणार? असा सवाल थोरात यांनी केला होता.