महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2019, 9:26 PM IST

ETV Bharat / state

माजी सभापती शिवाजीराव देशमुखांच्या आठवणीने गहिवरले सभागृह

माजी सभापती शिवाजीराव देशमुखांच्या आठवणीने सभागृह गहिवरले... सहकारमंत्री चंद्रकात पाटलांनी सभागृहात मांडला शोक प्रस्ताव... भावी पिढीला योगदान कळावे यासाठी देशमुखांची भाषणे डिजिटल करण्याची सभागृह सदस्यांची मागणी

सभागृह

मुंबई - विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनावर विधानपरिषदेत शोक प्रस्ताव संमत करण्यात आला. देशमुख यांनी संसदीय कामकाजाची उंची वाढविण्यापासून ते त्यांनी अनेक नवीन आमदारांना केलेल्या मार्गदर्शना बद्दलच्या आठवणीने आज विधानपरिषदेतील दोन्ही बाजूचे सदस्यांना गहिवरून आले.

देशमुख यांनी केलेल्या संसदीय योगदानाची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी त्यांच्या नावाचे एखादे दालन अथवा त्यांच्या गाजलेल्या भाषणाचे डिजिटल संग्रह करावा, अशा अनेक मागण्या सदस्यांनी देशमुख यांच्यावरील शोक प्रस्तावादरम्यान मांडल्या.


सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि माजी विधानपरिषदेचे सदस्य कृष्णराव पांडव यांच्या निधनावरील शोक प्रस्ताव मांडला. त्याला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यावर मुंडे यांच्यासह काँग्रेसचे शरद रणपिसे, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, आनंदराव पाटील, विक्रम काळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


काँग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले की, शिवाजीराव देशमुख हे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक होते. इंदिरा गांधी यांच्याबद्दल ममत्व होते, इंदिरानिष्ठ पांडव म्हणून ओळख होती सर्वसामान्यांची दुःखे ती ओळखत होते. देशमुख इथेच आहेत, असे आम्हाला जाणवते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या परंपरेतील ते शेवटचा दुवा होते. ते सुरुवातीला प्रशासकीय सेवेत होते. कोयनेचा भूकंप झाला त्यावेळी त्यांनी शासन व्यवस्थेचे काम उत्तमरित्या पार पाडले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जवळपास १० वर्षे डायलिसिस करून ते सभागृहाचे कामकाज चालवत होते. १९८५ ते विधानसभेत आले होते. देशमुख विचाराने गांधीवादी आणि वसंतदादा पाटील यांचे जवळचे असल्याचीही आठवण रणपिसे यांनी सांगितली.

शिवाजीराव देशमुखांचे १४ जानेवारीला निधन झाले. त्याच्या आयुष्याच्या ८४ वर्षात त्यांनी ५२ वर्षे कधी मागे वळून पाहिलेच नाही. काँग्रेस पक्षाची वर्किंग कमिटी आहे, त्या कमिटीत जो निर्णय घेण्यात येतील ते-ते टिपण तयार करायचे आणि आग्रहाने ते सोनिया गांधी यांच्या समोर मांडायचे. चारित्रसंपन्न, निधर्मी, सामान्यांचा असामान्य असे ते नेते होते.


शेकापचे जयंत पाटील म्हणाले, की वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून देशमुखांची ओळख होती. २८९ चा गैरवापर होतोय, असे असताना त्यांनी त्या-त्या विषयाला न्याय दिला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर २८९ सुरू करण्याचा त्यांनीच निर्णय घेतला आणि तो नियम बदलला गेला. व्यक्तिगत ते कोणाचाच राग करत नसत. कोयनेचे पुर्नवसन आणि त्यांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, हे त्यांचे दुःख होते. सभागृहाच्या कामकाजाची त्यांनी उंची वाढवली असल्याचेही पाटील म्हणाले.


रावते यांनी देशमुख यांच्या कामकाजाच्या आठवणी सांगताना त्यांचे सभागृहातील शेवटच्या शब्दांची आठवण करून दिली. 'वालीव सुग्रीवाच्या भांडणात रामाने बाण का मारला, हे मला कळले नाही...' हे त्यांचे वाक्य सभागृहात सांगितल्यानंतर काही वेळ सभागृहाचे वातावरण सुन्न झाले होते.


देशमुखांचे योगदान भावी पिढीला कळावे म्हणून त्यांची भाषणे डिजिटल करा -


भाई जगताप म्हणाले, की देशमुख हे ऋषितुल्य होते. आम्ही त्यांच्याकडून खूप शिकलो. देशमुख यांच्या नावाने काही करता आले तर करावे. त्यातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशी विनंती त्यांनी केली. तर हेमंत टकले यांनी नवीन निवडून आलेल्या आमदारांसाठी देशमुख यांच्या नावाने सहा महिन्यांची इंटर्नशिप ठेवण्यात यावी, त्यांची दहा भाषणे डिजिटल करून ठेवता आली तर ती त्यांची आठवण कायम राहिल, अशी मागणी केली. प्रसाद लाड यांनी त्यांच्यासाठी संदर्भ ग्रंथ तयार केला जावा, अशी मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details