महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 22, 2021, 7:04 AM IST

Updated : May 22, 2021, 7:44 PM IST

ETV Bharat / state

Live Updates : नौदलाकडून खोल पाण्यात जात शोध सुरू; मृतांचा आकडा 66 वर

बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील शोध मोहीम
बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील शोध मोहीम

19:43 May 22

अलिबाग आवास समुद्रकिनारी मृतदेह आढळला

रायगड - अलिबाग आवास समुद्रकिनारी याआधी चार मृतदेह सापडले होते. आज अजून एक मृतदेह सापडला आहे. मृतदेह सापडलेला व्यक्ती पी 305 बार्जमधील कर्मचारी असल्याची शक्यता आहे. यासंदर्भातली माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने ओएनजीसी कंपनीला दिली आहे. 

19:41 May 22

मृतांचा आकडा 66 वर

मुंबई - तोक्ते चक्रीवादळात अडकलेल्या पी 305 या बार्जवर मदत व बचाव कार्यासाठी भारतीय नौदल अजूनही काम करत  आहे. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप भारतीय नौदलाने वाचवले असून, 66 कर्मचाऱ्यांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या शोध व बचाव कार्यासाठी भारतीय नौदलातर्फे काम केले जात आहे. यासाठी समुद्रात खोलवर जाऊन शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस मकरद्वारे ड्रायव्हर शोध घेत आहेत.  

16:20 May 22

पी 305 बार्जच्या दुर्घटनेवर राज्य सरकारमधील मंत्री राजकारण करतायेत - आशिष शेलार

मुंबई - पी 305 हे बार्ज तौक्ते चक्रीवादळात दुर्घटनाग्रस्त झालं. या बार्जवर काम करणाऱ्या जवळपास साठ कामगारांचा मृत्यू झाला. तर 180 कामगारांना वाचवण्यात आलं. मात्र आता या दुर्घटनेनंतर या सर्व प्रकरणावर राजकारण सुरू झाले असून राज्य सरकारमधील पी 305 या बार्ज दुर्घटनेवर राज्य सरकारमधील मंत्री राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. 

15:27 May 22

30 मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी - मुंबई पोलीस

चैतन्य एस - डीसीपी

मुंबई - पी 305 बार्जवरील दुर्घटनेतील 61 कर्मचाऱ्यांचे मृतदेह मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. त्यापैकी 31 मृतदेहांची ओळख पटलेली आहे, 28 मृतदेह संबंधित नातेवाईकांना देण्यात आले आहेत. अजूनही 30 जणांची ओळख पटत नसल्यामुळे त्यांचे डीएनएचे नमुने घेतले जात आहेत.  

13:04 May 22

पी 305 बार्ज चा कॅप्टन राकेश बल्लव अजूनही बेपत्ता

पी 305 बार्ज वर काम करणाऱ्या मुस्तफिजुर रहमान शेख यांच्या तक्रारीवरुन बार्ज चा कॅप्टर राकेश बल्लव याच्या विरोधात येलोगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मात्र तोक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी 305 चा कॅप्टन राकेश बल्लव हा अद्यापही नौदलाच्या बचाव व शोध मोहीम कामादरम्यान आढळून आलेला नसून सध्या तो बेपत्ता आहे.

12:46 May 22

आणखी एक मृतदेह हाती, सडलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी करून ओळख पटवणार - मुंबई पोलीस

बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोध मोहीम अद्याप सुरू आहे. या शोध मोहिमे दरम्यान आज आणखी एकाचा मृतदेह हाती आला आहे. तो शोध पथकाने मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. दरम्यान या एकूण ६१ मृतांपैकी आतापर्यंत २६ जणांची ओळख पटवण्यात यश आले. तसेच शवविच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईंकांना देण्यात आले आहेत.

मात्र काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असल्याने आता मृतदेह आणि नातेवाईंकांचा डीएनए जुळवूनच त्यांची ओळख पटवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

09:29 May 22

आयएनएस मकर आणि तरासाची मदत; डायव्हर्सकडून खोल समुद्रात शोध मोहीम सुरू

डायव्हर्सकडून खोल समुद्रात शोध मोहीम सुरू

तौक्ते चक्री वादळात अडकलेल्या पी 305 या बार्जवर मदत व बचाव कार्यासाठी भारतीय नौदल अजूनही काम करीत आहे. या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाकडून समुद्रात खोलवर जाऊन कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस मकर ची मदत घेतली जात आहे. या शोध व बचाव कार्यासाठी आयएनएस मकर व आयएनएस तरासाचे ड्रायव्हर्स काम करत आहेत.
 

06:51 May 22

बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील शोध मोहीम सुरूच

आयएनएस मकर आणि तरासाची मदत

मुंबई -तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. तर आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शोश मोहिमेत हाती आलेल्या एकूण मृतदेहांपैकी २३ जणांची ओळख पटली आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल

अरबी समुद्रात पी-३०५ हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष-

शुक्रवारी(21 मे) सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक जेजे रुग्णालयामध्ये पोहोचले. परंतु, रुग्णालयामध्ये येलोगेट पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर मृतदेह हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित नसल्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

मृतांचे नातेवाईक आणि ओएनजीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची -

पी 305 बार्ज दुर्घटनेप्रकरणी मृतांचे नातेवाईक आणि ओएनजीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. कंपनीकडून पाच लाख रुपये मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली होती. तसेच प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार - मुंबई पालकमंत्री अस्लम शेख

एवढं मोठे वादळ येणार याची कल्पना दिली असताना, हे सगळं घडले आहे. याला पूर्णपणे ओएनजीसी कंपनी जबाबदार आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 51 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. ओएनजीसी कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहीजे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

Last Updated : May 22, 2021, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details