महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2021, 4:50 PM IST

Updated : Jul 7, 2021, 4:58 PM IST

ETV Bharat / state

शिंदे ते सिंधिया, वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या ज्योतिरादित्य यांची जाणून घ्या राजकीय कारकीर्द

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असलेलं एक नाव म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया.

joyotiraditya Shinde
joyotiraditya Shinde

हैदराबाद -मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज आहे. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असलेलं एक नाव म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जायचे अशा ज्योतिरादित्य यांनी नाराज होऊन भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर राज्यसभेत त्यांची निवड करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी ज्योतिरादित्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधियांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया...

ज्योतिरादित्य सिंधियांची राजकीय कारकीर्द -

  • ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर घराण्याचे वंशज आहेत. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव सिंधिया हे नेहरु-गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जात होते. ३० सप्टेंबर २००१ ला उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत माधवरावांचे निधन झाले. ते मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
  • माधवराव सिंधियांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००२ मध्ये पारंपरिक गुना मतदारसंघातून ते वडिलांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विजयी झाले.
  • २००२ची पोटनिवडणूक, त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत ज्योतिरादित्य लोकसभेत निवडून गेले. मात्र २०१९ मध्ये सिंधियांचा गड भाजपाने जिंकला. ज्योतिरादित्य यांचे स्वीय सहायक राहिलेले के.पी.एस यादव यांनी ज्योतिरादित्य यांचा पराभव केला.
  • ज्योतिरादित्य हे राहुल गांधींचे जवळचे मानले जात होते. युपीए १ आणि २ मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि उद्योग तसेच २०१४ मध्ये ऊर्जा खाते सांभाळले होते.
  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ज्योतिरादित्य यांना राज्यात मोठी संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतरही त्यांना हवी तशी संधी दिली गेली नाही. एवढेच नाही तर राज्यसभेवरही त्यांची वर्णी लागली नाही.
  • काँग्रेसमध्ये योग्य संधी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ११ मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधियांच्या भाजप प्रवेशानंतर मध्यप्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर आले. यात ज्योतिरादित्य यांचे मोठे योगदान राहिले होते.
  • केंद्रीय मंत्रीपदाचा अनुभव असलेले ज्योतिरादित्य हे चांगले वक्ते देखील आहेत.
Last Updated : Jul 7, 2021, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details