मुंबई -कोकणात रिफायनरी होत असताना कोकण परिसरातील इतर मोठ्या प्रकल्पांचे वास्तव काय याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. कोकणामध्ये आलेल्या सर्वात मोठ्या प्रकल्पांमधील एक म्हणजे एन्रॉनचा वीज प्रकल्प. नव्वदच्या दशकात या प्रकल्पाची पायाभरणी झाली. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्यसरकारांनी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी एन्रॉन प्रकल्प उभारण्याची योजना आखली. शरद पवार यांनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र त्यावेळच्या विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. तत्कालीन भाजपनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तर एन्रॉन प्रकल्प समुद्रात बूडवू असे विधान केले होते. ते त्यांचे विधान खूपच गाजले. राज्याला २२५० मेगावॉट वीज मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प राज्य वीज मंडळाच्या सहकार्यासाठी उभारण्यात येणार होता.
नाफ्ता गॅसवर आधारीत हा महाकाय प्रकल्प दाभोळच्या जवळ वेलदूरच्या परिसरात उभारण्यात आला. या प्रकल्पावर नंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यावर केसही झाली. कोर्टाने शेवटी या केसची फाईल बंद करण्याचे आदेशही दिले. या प्रकल्पाच्या निमित्ताने नंतर एवढे राजकारण झाले, की बोफोर्स प्रमाणे आरोप प्रत्यारोपांची मोठी राळ उडाली होती. सध्या मात्र हा प्रकल्प बंद आहे. गॅस महागला. वाहतूक महागली. त्यामुळे येथील वीज निर्मितीही खूप महागली. त्यामुळे काही काळ सुरू राहिलेला हा प्रकल्प सध्या मात्र पूर्णपणे बंद आहे.
एन्रॉन बरोबरच कोकणातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प होईल असे मानण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात होत असलेल्या या प्रकल्पामध्ये तब्बल ९९०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच अणूऊर्जा क्षेत्रात यानिमित्ताने परदेशी कंपनीचा सहभाग असणार आहे. फ्रान्सच्या अरेवा कंपनीने विकसित केलेल्या अणूभट्ट्या या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. यासाठी २०१० साली फ्रान्स सरकारबरोबर करार करण्यात आला. मात्र या प्रकल्पामध्ये कितपत प्रगती झाली याची नेमकी माहिती मिळू शकत नाही. आमच्या प्रतिनिधीने माहिती देताना सांगितले की या भागात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. आत काय चालले आहे, ते काही कळत नाही. मात्र कंपाउंडची भिंत पूर्णपणे बांधून झाल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचे आणि खूप पुढे गेल्याचे एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. मात्र तशी काही चिन्हे प्रत्यक्षात काही दिसत नाहीत. एकूण सुमारे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये प्रस्तावित आहे. हा प्रकल्प २०१३ मध्ये काही प्रमाणात सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र आता २०२३ उजाडले नाही तर अर्धे संपत आले तरी तिथे ऊर्जा निर्मिती सुरू झाल्याची अजूनही बातमी नाही.
एकूणच कोकणातील विकास प्रकल्पांचा विचार केल्यास तिथे प्रकल्प झाला, तरी तो बंद पडतो असाच अनुभव एन्रॉनच्या निमित्ताने आला आहे. आता बारसूच्या प्रकल्पाचे आतापासूनच राजकारण सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे काय होणार हे त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळातच समजेल. सध्या कोकणात बऱ्यापैकी सुरू असलेले प्रकल्प म्हणजे जिंदालचा प्रकल्प आणि फिनोलेक्सचा प्रकल्प. मात्र हे उद्योग तुलनेने खूपच छोटे आणि खासगी आहेत. कोकणातील माणूस निसर्गात रमणारा आहे. त्याला आंबे-फणस नारळी-पोफळीसह काजूच्या सहवासात राहायला आवडते. त्यामुळेच की काय कोकणला उद्योग आणि प्रकल्पाचे वावडे असल्याचे दिसते. एकप्रकारे परशुरामाच्या या भूमिला हा एक श्राप आहे, अशी चर्चा अधूनमधून स्थानिकांच्यामध्ये ऐकू येते.
हेही वाचा - Barsu Refinery Political Story : बारसू रिफायनरी प्रकल्पाचे राजकारण पेटणार, कोकणची जनता कुणाला कौल देणार हाच कळीचा मुद्दा