मुंबईत अनलॉकदरम्यान वाढली अवैध प्रवासी वाहतूक - MUMBAI corona patients
मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ही अजूनही सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा सर्वाधिक ताण पडत आहे. याचा फायदा परवानाधारक नसलेले खासगी वाहनचालक घेत आहेत. यामुळे परवाना असलेल्या टॅक्सी व रिक्षाचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
![मुंबईत अनलॉकदरम्यान वाढली अवैध प्रवासी वाहतूक Illegal passenger traffic increased during unlock in Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9587400-933-9587400-1605746235750.jpg)
मुंबई- कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली होती. तर, रस्त्यावर विनाकारण वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. आता शहरात सर्वत्र अनलॉक करण्यात आल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. मात्र, मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ही अजूनही सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा सर्वाधिक ताण पडत आहे. याचा फायदा परवानाधारक नसलेले खासगी वाहनचालक घेत आहेत. यामुळे परवाना असलेल्या टॅक्सी व रिक्षाचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहा या संदर्भातील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट..
अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी मुंबईत होतेय कारवाई -
मुंबई शहरात अनधिकृत वाहतूक प्रकरणी मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत अनधिकृत वाहतूक प्रकरणी 3059 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 443, मध्य मुंबईत 235, पूर्व मुंबईतून 309, पश्चिम मुंबईतून 268 तर सर्वाधिक उत्तर मुंबई 1804 अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
राज्यात अनधिकृत वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई -
राज्यात परवाना नसलेल्या प्रवासी वाहतूक करण्याच्या संदर्भात तब्बल 96 हजार 770 वाहन जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 43 हजार 287 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करण्याच्या संदर्भात 1347 गुन्हे राज्यात नोंदवण्यात आले असून आतापर्यंत 39 कोटी 41 लाख 16 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बीजेपी वाहतूक संघटनेची कारवाईची मागणी -
सध्या मुंबई शहरामध्ये परवानाधारक टॅक्सीचालक, रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी म्हटले आहे. घेतलेल्या वाहनांचे कर्ज फेडताना परवानाधारक वाहनचालकांच्या नाकी नऊ आले असून खासगी वाहन चालकांकडून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे परवानाधारक वाहतूक चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून तातडीने पावले उचलावी आणि अशाप्रकारच्या वाहतुकीवर अंकुश बसवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.