मुंबई- अनधिकृत बांधकाम मुंबई शहरात आपल्याला जागोजागी पाहावयास मिळते. या अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे किंवा या बांधकामामुळे संकट ओढवले की प्रशासन जागे होते हे आपल्याला मुंबई शहरात वेळोवेळी दिसते. अशाच एका माहीम येथील अनधिकृत बांधकामाला नागरिक कंटाळले आहेत. वारंवार या बांधकामाबद्दल संबधित म्हाडा व बीएमसी प्रशासनाला तक्रार करूनदेखील यावर कारवाई केली जात नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
माहिम मच्छिमार नगर (इमारत क्र. २२ब/११६१) येथे शंकर धडके यांनी पूर्वकडे व उत्तरेकडे इमारतीच्या तळमजल्यावरील सामायिक जागेत अनधिकृत बांधकाम केले. तर पश्चिमेकडे इमारतीच्या परिसरात झोपडीधारकांच्या झोपड्यांमुळे नियमित वर्दळीला मोठी बाधा निर्माण झाली आहे. दुर्दैवाने येथे एखादी आपत्ती उद्भवल्यास मदत पोहोचू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात इमारतीतील व गुरुदत्त कोळी समाज रामगड येथील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री-राज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. तरीदेखील म्हाडा प्रशासन या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाही. एखाद्याचा जीव किंवा एखादी अपरिचित घटना घडल्यावर यावर कारवाई होणार का ?असे स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.