महाराष्ट्र

maharashtra

IIT Student Suicide Case : आयआयटीने प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली; दर्शनच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By

Published : Mar 24, 2023, 8:31 PM IST

फेब्रवारी महिन्यात मुंबई आयआयटीमध्ये दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली होती. जातीय भेदभावातून ही आत्महत्या केल्याचा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र, हा आरोप फेटाळत आयआटीने एक अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवालच दर्शनच्या कुटुंबीयांनी फेटाळला आहे. दर्शनच्या आई-वडिलांनी आज संचालक सुभाषित चौधरी यांची भेट घेतली व आयआयटीचा अहवाल नाकारला आहे.

file photo
फाईल फोटो

मुंबई -दर्शन सोळंकी याने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयआयटीच्या आवारात आत्महत्या केली होती. जातीय भेदभावाच्या वागणुकीचा त्रास झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी तसेच काही विद्यार्थी संघटनांनी केला होता. या घटनेला आयआयटीमधील प्रशासन आणि वातावरणातील जातीय व्यवस्था कारणीभूत आहे, असा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी याआधी केलाच होता. मात्र, आता त्यांनी आयआयटीने मागील दहा दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेला अहवाल नाकारला आहे.

दर्शनच्या कुटुंबीयांचा आरोप - आयआयटीच्या प्राध्यापक नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचाी चौकशी केली. त्यानंतर या समितीने ही आत्महत्या जातीभेदातून झाली नसल्याचे स्पष्ट केले व तसा अहवाल सादर केला. हा अहवाल दर्शनच्या कुटुंबीयांनी नाकारला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या वेळेला प्राध्यापक नंदकिशोर समिती याबाबत चौकशी करत होती तेव्हा त्याच्या वर्गमित्रांशी ते बोलले. मात्र, दर्शनच्या सख्ख्या बहिणीशी ते बोलले नाहीत. हा काय प्रकार आहे? येथे देखील चौकशीची पद्धत विषम होती, असे दिसून येते. तसेच जातीभेदाचे कोणतेही मुद्दे चौकशी समितीने विचारात घेतले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

चौकशी अहवाल नाकारला - चौकशी समितीने आधीच ठरवले होते की तपास कोणत्या दिशेने गेला पाहिजे. आम्ही आयआयटी प्रशासन तसेच पवई पोलिसांकडे दिलेला जबाबाचा उल्लेख आयआयटीच्या त्या अहवालात नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाची बाजू त्यांनी अहवालात मांडली नाही. त्यामुळे हा अहवाल एकतर्फी असल्याचा गंभीर आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी केला आहे.

चौकशी एकतर्फी झाली - चौकशी समितीसंदर्भात दर्शनच्या कुटुंबीयांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची तपासणी करत असताना ॲट्रॉसिटी कायद्यामधील, मानवाधिकार क्षेत्रामधील, कायद्याचे जाणकार असे कोणतेही तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आयआयटीच्या या चौकशी समितीत केला नाही. त्यामुळेच वस्तुनिष्ठ पद्धतीने दर्शन सोळंकीच्या मृत्यूचा तपास होऊ शकत नाही हे त्यावरून लक्षात येते, असा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आयआयटीची बाजू अद्याप अस्पष्ट - या अहवालाबाबत आयआयटी प्रशासनाकडे संपर्क केल्यावर देखील कोणताही संपर्क आणि प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आयआयटी मुंबई यांची बाजू समजू शकलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details