मुंबई - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत माणसांबरोबरच भटक्या प्राण्यांची देखील उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्या विभागात रस्त्यावर फिरणारे भटके श्वान, मांजरी उपाशी राहू नये, यासाठी प्राणी मित्रांकडे खाद्य सुपूर्द केले.
उन्हाळ्यात प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात तहान लागते. त्यामुळे पाण्यावाचून प्राण्यांचे हाल होऊ नयेत यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठेही भुकेल्या माणसासोबतच कोणत्याही मुक्या प्राण्याला भूक आणि पाण्यावाचून वंचित ठेऊ नका, असे आवाहन घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले आहे. माणुसकीचे हे दर्शन घडवून निसर्गाचे, समाजाचे आता खऱ्या अर्थाने पांग फेडण्याची वेळ आहे, असा विचार करुन प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य ते मदतकार्य करावे. माणूस असो वा मुका जीव कुणीही भुकेला राहू नये, याची काळजी घ्या, असेही घोसाळकर यांनी सांगितले.