महाराष्ट्र

maharashtra

राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

By

Published : Aug 17, 2020, 2:39 PM IST

Updated : Aug 17, 2020, 5:40 PM IST

राज्यभरात यंदा समाधानकारक पर्जंनाची शक्यता वतर्वण्यात आली होती. यानुसारच राज्यभरात विश्रांतीनंतर पावसाने परत एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यात आनंदाचे वातावरण असून धरण क्षेत्र भरल्याने मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली येणार आहे.

पाऊस
पाऊस

  • मुंबई - राज्यभरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणक्षेत्र भरले असून अनेक नदी-नाल्यांना पूर आले आहेत. यामुळे अनेक नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • सांगली - संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या कृष्णेची पाणी पातळी ही 33 फुटांवर पोहचली आहे. कृष्णेची इशारा पातळी ही 40 फूट तर धोका पातळी ही 45 फुटांवर आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन सांगली पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. रविवारपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
    सांगलीतील पाऊस

तर सांगली शहरातील पूर पट्ट्यात नदीचे पाणी घुसू लागले आहे. कालपासून या भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने चांदोली धरणातून 14486 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

  • सातारा - मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला महापुराचे स्वरूप आल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणीपातळी वाढत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सुद्धा ३७ फुटांवर पोहचली असून काही तासांतच इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच जिल्ह्यातील 95 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यात एनडीआरफची पथके सुद्धा तैनात करण्यात आली असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    कोल्हापुरातील पाऊस
  • गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग शनिवार रात्री पासून बंद झाला आहे. आज (सोमवारी) पूर काही प्रमाणात ओसरत असला तरी कुमरगुडा नाल्यावर पुराचे पाणी असल्याने आज दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. तर सिरोंचा - असरअल्ली - जगदलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.६३वरील असरअल्लीच्या पुढे सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्गही वाहतुकीसाठी बंद आहे.
    गडचिरोलीत गावांचा संपर्क तुटला
  • नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाची 35% तूट भरून निघाली आहे. जिल्ह्यातील तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडले असून 91267 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचा पाणी विसर्ग अजून वाढणार आहे.
  • अमरावती - मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वरुड तालुक्यातील घोडदेव धबधबा चांगलाच प्रवाहित झाला आहे. यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी झुंज नदी दुथडी भरून वाहत आहे.सोबतच जिल्ह्यातील नदी, नाले, बंधारे पाण्याने ओसंडून वाहत आहेत.

यासोबतच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या मेळघाटात श्रावण महिन्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील पाच दिवसांपासून मेळघाटात सातपुडा पर्वत रांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेळघाटातील चिखलदरा धारणी तालुक्याचे सौंदर्य आणखीच बहरले आहे. भर दिवसाही रस्त्यावर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्याने यंदा मात्र मेळघाटातील पर्यटनाच्या आनंदापासून पर्यटकांना मुकावे लागत असल्याचे चित्र आहे.

  • रायगड - जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून मासेमारी करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानंतर चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कोळी बांधवानी आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी पाठविल्या. मात्र 3 ऑगस्ट नंतर समुद्रातील वातावरणात बदल झाल्याने 20 ऑगस्टपर्यत मासेमारी करण्यास मत्स्य विभागाने बंदी घातली आहे. यामुळे ऐन हंगामात मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे.
  • नाशिक - नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरण ओव्हर फ्वो झाले आहे. हे धरण तब्बल 8 वर्षानंतर भरल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि बळीराजा सुखावला आहे.
  • ठाणे - मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरू आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यतील धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी मिटणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • नांदेड - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर संततधार पाऊस होत आहे. या पावसामुळे हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर या तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नसून अधून-मधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. हातातोंडाशी आलेले मुगाचे पीक वाया गेले असून सोयाबीन पीकही पिवळे पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
  • हिंगोली- जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. यासह येलदरी धरण देखील शंभर टक्के भरल्याने धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ आता सिद्धेश्वर धरणाचे देखील आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. दोन्ही ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या 50 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • परभणी - बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी धरणाचे 6 दरवाजे उघडून 12 हजार 600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धरणावर यापुर्वीच दोन संचांच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
  • बीड - मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ९९ टक्के भरले आहे. याशिवाय माजलगाव बॅक वॉटरमध्ये 75 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. दरम्यान यंदा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे.
  • रत्नागिरी - मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात शनिवारी सायंकळपासूनच वेगवान वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक नदी नाले पाण्याखाली आले आहेत. दरम्यान, वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल शनिवार रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. तर संगमेश्‍वर तालुक्यातील गडनदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    रत्नागिरीतील पाऊस
  • वाशिम - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील रिसोड शहरासह, शिरपूर, रिठद गावाला पाणी पुरवठा करणारा आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळं रिसोड शहरासह,शिरपूर, रिठद गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.तर परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाच वातावरण आहे.
  • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अनेक ठीकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कुडाळमधील भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कुडाळ रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर कुडाळ पंचायत समिती कडील शहराकडे जाणारा रस्ता देखाल पाण्याखाली गेला आहे.यासोबतच जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कुडाळ येथील भंगसाळ नदीला पूर आला असून कुडाळ शहरातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील समुद्री भागातही उधाणाचा फटका बसला आहे. देवगड मधील दहीबाव समुद्र किनारी लाटांचा तडाखा बसत असून आधीच या ठिकाणी किनारी भाग खचला असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
  • पंढरपूर (सोलापूर) - पुणे आणि सातारा जिल्ह्यातील धरणातून भीमा आणि नीरा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. उजनी धरणातील पाणीसाठा 42 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 42 हजार क्यूसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा व नीरा नदीकाठी असलेल्य गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पंढरपूर नगरपालिकेने शहरातील पूर रेषेतील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
  • पालघर - जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पालघर, डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी- नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीतदेखील वाढ झाली आहे. यामुळे धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून सूर्या नदीत सुमारे 10 हजार 604 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Last Updated : Aug 17, 2020, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details