महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्वारंटाईन नियमात सूट मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर, मुंबईत येताना पालिकेला लेखी कळवावे लागणार - मुंबई क्वारंटाईन कालावधी बातमी

काही अधिकारी क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्याला मुंबईत कामानिमित्त यायचे असेल, त्यांना मुंबई महापालिकेला दोन दिवस आधी लेखी कळवावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले कामाचे कारण योग्य वाटले तरच यापुढे क्वारंटाईनमधून सूट दिली जाणार आहे.

मुंबईत येताना पालिकेला लेखी कळवावे लागणार
मुंबईत येताना पालिकेला लेखी कळवावे लागणार

By

Published : Aug 7, 2020, 9:34 PM IST

मुंबई : मुंबईत विमानाने प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा नियम आहे. मात्र, क्वारंटाईन केले जाऊ नये म्हणून सरकारी अधिकारी पदाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता मुंबईत येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप लेखी सांगावे लागणार आहे. त्यानंतरच क्वारंटाईनमधून सूट दिली जाणार आहे.

सिने अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले होते. या प्रकरणी राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण झाला होता. पालिकेने या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारच्या २५ मे २०२० च्या गाईडलाईन प्रमाणे क्वारंटाईन केल्याचे स्पष्ट केले आहे. तिवारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यासाठी, नियमानुसार सात दिवसात मुंबईमधून बिहारला परत जाण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार विनय तिवारी यांनी बिहारला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे मोठा वाद झाल्याने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी क्वारंटाईनबाबत आदेश काढले आहेत. यात काही अधिकारी क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्याला मुंबईत कामानिमित्त यायचे असेल, त्यांना मुंबई महापालिकेला दोन दिवस आधी लेखी कळवावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले कामाचे कारण योग्य वाटले तरच यापुढे क्वारंटाईनमधून सूट दिली जाणार आहे. अन्यथा त्या अधिकाऱ्यांना तसेच प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.

काय म्हणतो नियम -

केंद्र आणि राज्य सरकारच्या २५ मे २०२० च्या गाईडलाईननुसार विमान प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन केले जाते. सरकारी अधिकाऱ्यांना कामानिमित्त मुंबईत यायचे असल्यास आणि त्यांना क्वारंटाईनमधून सूट हवी असल्यास पालिकेला तसे लेखी कळवावे लागते. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनमधून सूट दिली जाते. तसेच सात दिवसात मुंबईतून परत जाणार असल्याचे तिकीट दाखवल्यासही क्वारंटाईनमधून सूट दिली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details