महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 21, 2019, 11:55 PM IST

Updated : Dec 22, 2019, 12:04 AM IST

ETV Bharat / state

पाहा कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय शेतकरी नेत्यांना?

सरकारने केलेल्या या कर्जमाफीबाबत शेतकरी नेते समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी नेत्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. पाहूया नेमकं काय वाटतंय त्यांना...

Farmer leaders comment on loan waiver decision
कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल काय वाटतयं शेतकरी नेत्यांना?

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांचे बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना सरसकट २ लाखापर्यंतची कर्जमाफी देणार असल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली. मात्र, या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या सरकारने केलेल्या या कर्जमाफीबाबत शेतकरी नेते समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी नेत्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. पाहूया नेमकं काय वाटतंय त्यांना...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकरी नेते नाराज आहेत. सरकारने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे बोलले जात आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी

कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी नाही, सातबारा कोरा करा - राजू शेट्टी

सरकारच्या या कर्जमाफीवर मी समाधानी नाही. या कर्जमाफीचा लाभ फार कमी लोकांना होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. या सरकारने सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. कर्जमाफीची आज जी घोषणा करण्यात आली, त्यात केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्याच थकबाकीदारांचे कर्ज माफ होणार आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. त्यामुळे ज्यांचे या महापुराने आणि दुष्काळाने नुकसान झाले आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.

सदाभाऊ खोत

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे सरकारची हातचलाखी - सदाभाऊ खोत

कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने हातचलाखीचा खेळ खेळला असल्याचे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधला. सुरुवातीला या सरकारने सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसा निर्णय त्यांनी घेतला नाही. फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांकडे अनेक प्रकारचे कर्ज असते. शेतीसाठी ट्रॅक्ट, विहीर, पाईपलाईन यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे ५ लाखांच्यावरही कर्ज आहे. ते शेतकरी या कर्जमाफीत बसणार नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

अजित नवले

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला तडा - अजित नवले

सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. २ लाखांची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला तडा असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केले. २ लाखांची मर्यादा ही फार कमी आहे. याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार नाही, यामध्ये फार कमी शेतकरी बसतील असे नवले म्हणाले. सरकारने २ लाख कर्जमाफीचा निर्णय मागे घेत सातबारा कोरा करण्याचा निर्णय घ्यावा.

रघुनाथ पाटील

फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये फरक काय? रघुनाथ पाटील

शेतकऱ्यावर असणारे सर्व कर्ज सरसकट माफ झाले पाहीजे. एखाद्या शेतकऱ्यावर जर ५० लाखांचे कर्ज असेल तर तेही कर्ज माफ झाले पाहिजे. या सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. हे सरकार आणि फडणवीस सरकारमध्ये काय फरक, असे म्हणत रघुनाथ पाटील सरकारवर निशाणा साधला. कर्जवसुलीस येणाऱ्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू, असेही रघुनाथ पाटील म्हणाले.

कर्जमाफीची मर्यादा ५ लाखापर्यंत करावी - संजय पाटील घाटणेकर

सरकारने केलेल्या कर्माफीवर आम्ही समाधानी नसून, या कर्जमाफीची मर्यादा २ लाखावरुन ५ लाख करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी केली. या कर्जमाफीचा फायदा कोरडवाहू शेतकऱ्यांनाच होणार आहे. बागायती भागात असणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याला याचा फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची मर्यादा ५ लाख करावी. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचे घाटणेकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. जर सरकारने अशा निर्णय घेतला नाही तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी घाटणेकर यांनी दिला.

चंद्रकांत वानखेडे

शेतकरी चिंतामुक्तीच्या दृष्टीने सरकारचे एक पाऊल - चंद्रकांत वानखेडे

सरकारने केलेल्या कर्जमाफीवर मी समाधानी आहे. या कर्जमाफीचा बऱ्यापैकी फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी दिली. या सरकारने २ लाखाच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी घातल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी चिंतामुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. आताची कर्जमाफी हे त्यादृष्टीने टाकलेले एक पाऊल असल्याचे वानखेडे म्हणाले. या कर्जमाफीने कोरडवाहू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचे वानखेडे म्हणाले.

Last Updated : Dec 22, 2019, 12:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details