महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2020, 8:03 PM IST

ETV Bharat / state

मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 लाखांची मदत; सरकारला आली जाग

मृत कोरोना योध्याच्या कुटुंबाने विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मात्र राज्यातील एकाही सरकारी रुग्णालयातील मृत परिचारिकांच्या कुटुंबाला ही रक्कम मिळालेली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आवाज उठवला होता. 'ईटीव्ही भारत'ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत या विषयाला वाचा फोडली होती.

मुंबई
मुंबई

मुंबई- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर-नर्स (परिचारिका) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मृत कोरोना योध्याच्या कुटुंबाने विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मात्र राज्यातील एकाही सरकारी रुग्णालयातील मृत परिचारिकांच्या कुटुंबाला ही रक्कम मिळालेली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आवाज उठवला होता. 'ईटीव्ही भारत'ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत या विषयाला वाचा फोडली होती. त्यानुसार अखेर या वृत्ताची दखल घेत राज्य सरकारने कोरोना योध्या अर्थात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासाठीचे प्रस्ताव एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे परिचारिका खूश आहेत.

ऑक्टोबरपर्यंत 10 परिचारिकांचा मृत्यू

कोरोनाचा कहर राज्यात सुरू झाल्याच्या दिवसापासून शासकीय रुग्णालयातील पारिचारिका कोरोनाशी दोन हात करत आहेत. मनुष्यबळ कमी आणि रुग्ण अधिक त्यात महामारीची भीती. पण अशा परिस्थितीतही या परिचारिकांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आज कोरोना नियंत्रणात आणण्यास मोठी मदत केली आहे. मात्र, यावेळी 16 टक्क्यांहून अधिक परिचारिका कोरोनाग्रस्त झाल्या आहेत. तर 28 ऑक्टोबरपर्यंत 10 सरकारी परिचारिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांनी दिली आहे.

मागील महिन्यापर्यंत एकाही कुटुंबाला विम्याची रक्कम नाही

केंद्र सरकारने कोरोना योध्यांना 50 लाखांचा विमा लागू केला आहे. त्यानुसार मृत कुटुंबाकडून ही रक्कम मिळावी म्हणून संबंधित विभागाकडे अर्ज केले. पण, एकाही कुटुंबाला ही रक्कम मिळाली नाही. काही ना काही कारण सांगत वा निधी नसल्याचे म्हणत हे प्रस्ताव रोखून धरले. कोरोना योध्याच्या प्रति असलेल्या या उदासीन धोरणाचा निषेध करत परिचारिका संघटनेने याविरोधात आवाज उठवला. तर 28 ऑक्टोबरला 'ईटीव्ही भारत'ने याविषयीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. तर महत्त्वाचे म्हणजे संघटनेने सरकारला अल्टीमेटम देत हा प्रश्नच मार्गी लावा, अन्यथा आंदोलन छेडू असा कडक इशारा दिला होता.

एका आठवड्यात प्रस्ताव सादर करा

कोरोना योध्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही हेळसांड लक्षात घेता अखेर सरकार जागे झाले आहे. बुधवारी सरकारने एक परिपत्रक जारी करत सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपापल्या जिल्ह्यातील हुतात्मा कोरोना योध्याच्या कुटुंबाकडून आलेले विम्यासाठीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवावेत, असे आदेश दिल्याची माहिती तोटे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शहीद सरकारी परिचारिकांच्या कुटुंबालाही 50 लाखांची रक्कम मिळणार असल्याने ही दिलासादायक बाब असल्याचेही तोटे यांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details