महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2020, 8:06 PM IST

ETV Bharat / state

वर्षा निवासस्थानी शरद पवार अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'या' विषयी खलबते

खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुमारे पाऊण तास विविध विषयांवर खलबते झाली आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई -मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात सुरू असलेले आंदोलने आणि मराठा समाजाची एकूणच आक्रमक भूमिका लक्षात घेऊन त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी आज (दि.19 सप्टें.) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बरीच खलबते झाली.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व पवार यांच्या तब्बल पाऊण तास ही बैठक झाली असून त्या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.

मुंबईत कंगना राणौत आणि तिच्या माध्यमातून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची 9 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीनंतर शिवसेनेकडून कंगना राणौत हा विषय बाजूला ठेवण्यात आला होता.आता राज्यात विरोधकांकडून मराठा आरक्षणाचा विषय राज्यभरात पेटवण्यासाठी रणनीती आखली जात असून त्यामुळेच विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. यामुळेच राज्यातील ही एकूणच परिस्थिती कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात महत्वाची बैठक झाली असल्याचे सांगण्यात येते.

दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात केंद्र सरकारने अत्यंत महत्वाची अशी पाच विधेयक मंजूर केली आहेत. त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राला मोठा फटका पडेल, या क्षेत्रातही खासगी भांडवलदारांनी मक्तेदारी वाढेल अशा स्वरूपाचे एक कृषी धोरण आणल्याने देशभरातून त्यावर विरोध सुरू आहे. यासाठीचाही विचार या बैठकीत झाला असल्याचे सांगण्यात येते.

राज्यातील विविध सनदी अधिकारी तसेच तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदलीवरून महाविकासआघाडीमध्ये बरीच नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात सरकार म्हणून कोणती भूमिका घेतली जावी, याविषयी पवारांनी काही मार्गदर्शन केले असल्याचे सांगण्यात येते. त्यासोबत राज्यातील विविध महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या असून त्यावर तिन्ही पक्षाकडून फॉर्म्युला तयार असतानाही त्या विषयीचा निर्णय मार्गी लागत नाही. यामुळे या बैठकीत चर्चा झाली असून त्याविषयीही मार्ग काढला जावा या संदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या अंतरिम निकालामुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून त्याचा फटका बसण्यापूर्वी सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येतील याविषयी या पाऊण तासाच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : मुंबईचे प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट सुरू होणार

ABOUT THE AUTHOR

...view details