महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेचं अस्तित्वच धोक्यात? नेते संभ्रमात तर कार्यकर्ते कोमात!

विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असताना, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र सामसुम दिसून येते. निवडणूक लढवायची की नाही या विवंचनेतच हा पक्ष अडकला आहे. राज ठाकरेंची तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची मनस्थिती आहे. त्यामुळे मनसेला या विधानसभा निवडणुकीत अस्तित्वासाठीच झगडावे लागणार आहे. तेवढेच नाही तर मनसेचे अस्तित्वच धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

By

Published : Sep 18, 2019, 7:44 PM IST

मनसेचं अस्तित्वच धोक्यात? नेते संभ्रमात तर कार्यकर्ते कोमात!

मुंबई- विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असताना, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र सामसुम दिसून येते. निवडणूक लढवायची की नाही या विवंचनेतच हा पक्ष अडकला आहे. राज ठाकरेंची तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची मनस्थिती आहे. त्यामुळे मनसेला या विधानसभा निवडणुकीत अस्तिस्वासाठीच झगडावे लागणार आहे. तेवढेच नाही तर मनसेचे अस्तित्वच धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे काँग्रेस-आघाडी बरोबर जाईल अशी शक्यता होती. त्यामुळे मनसेचं इंजीन काँग्रेस राष्ट्रवादाच्या इंधनावर जोरदार पळेल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेससह राष्ट्रवादीने अजूनही मनसेला विचारात घेतलं नाही. त्यामुळे मनसे एकाकी पडली आहे. मित्र पक्ष नाही, त्याच बरोबर अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर कमालीचा संभ्रम आहे. त्यात राज यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागले. त्यानंतर भाजप विरोधात घेतलेली आक्रमक भूमीका राज यांना अचानक मवाळ करावी लागली. त्यावरून अजित पवार यांनीही राज यांना लक्ष केले होते.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना केली. तरूण वर्ग राज यांच्यामुळे मनसेकडे आकर्षित झाला होता. पक्षानं लढवलेल्या २००९ च्या पहिल्या निवडणुकीत १२ आमदार निवडून आले. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज यांच्या उमेदवारांमुळे मत विभाजन होऊन शिवसेना-भाजपच्या जवळपास ५० उमेदवारांना फटका बसला होता. नाशिक महापालिकेतही मनसेने सत्ता काबिज केली होती. मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिका निवडणुकीतही मनसेने जोरदार कामगिरी केली. त्यानंतरच्या काळात मात्र मनसेची घरसण सुरू झाली. ती अद्यापही सुरूच आहे. मनसेला अजूनही सावरता आले नाही. २०१४ च्या निवडणूकीत तर मनसेचा सुपडा साफ झाला. केवळ एक आमदार निवडून आला. तो ही नंतर शिवसेनेत सहभागी झाली. सध्या मनसेचा एकही आमदार नाही. त्यात नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णयही मनसेने घेतला होता. मात्र त्यांनी भाजप विरोधात राज्यभर प्रचार केला. त्याचा हवा तसा फायदा झाला नाही.

राज आणि मनसेचा आलेख सतत ढासळत गेला आहे. याची कल्पना राज यांनाही आहेच. असे असले तरी राज यांचा करिष्मा कमी झालेला नाही. त्यांना ऐकण्यासाठी आजही तरूण तुटून पडतात, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. या सर्वांचा विचार करता राज निवडणूक न लढताच पराभव स्वीकारणार की धाडसानं मैदानात उतरून मनसेचे अस्तित्व दाखवून देणार, याकडे सर्व महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details