मुंबई- कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वॉर्डच्या बाहेर आहेत. तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कोरोनाचे मुंबईत आतापर्यंत 306 रुग्ण आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 537 रुग्ण असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे.