मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती आले आहेत. यात एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहार निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा नेत्यांनी या यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मात्र दिवसभरात फडणवीस यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मध्यरात्री त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
फडणवीसांचे आभार
फडणवीस यांनी सोशल माध्यमावर बिहार निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. धन्यवाद बिहार! बिहारच्या जनतेने हे स्पष्ट केले आहे की त्यांना जंगलराज नव्हे तर विकास हवा आहे! आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे.जनतेने नितीशकुमारांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो आणि त्यांचे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. फडणवीस म्हणाले, बिहारमधील भाजपाने 110 जागा लढवल्या आणि जिंकलेल्या जागांची टक्केवारी 67% आहे. 2015 च्या निवडणुकीत ते 34% होते. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणकारी अजेंडा आणि आमच्या सर्व कष्टकरी कामगारांना जाते. त्यामुळे पुन्हा मी संघ भाजपा बिहारचे अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.