महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात अघोषित आणीबाणी..! सरकार पत्रकारांवर दहशत निर्माण करतेय - देवेंद्र फडणवीस

राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून , लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये, अशी स्थिती निर्माण केली जात आहे.

By

Published : Apr 28, 2020, 4:47 PM IST

Updated : Apr 28, 2020, 5:08 PM IST

भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट
भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट

मुंबई - राज्यात अघोषित आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण करून पत्रकार व संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप कार्यकरणी पदाधिकारी यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन विनंती पत्र दिले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्यसरकारच्या माध्यम विषयक धोरणांवर सडकून टीका केली.

सरकार पत्रकारांवर दहशत निर्माण करतेय - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून , लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. वाधवान प्रकरणात नुकतेच एका वाहिनीचे पत्रकाराने सरकारी यंत्रणेने दिलेले पत्र सार्वजनिक केले होते. त्यानंतर वाद्रे येथील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याने त्यांना अनेक संवेदनशील(कोरोनाबाधित) क्षेत्रातून प्रवास करून उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे.

अशाच प्रकारे आणखी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या संपादका विरोधात थेट एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र पाठवून दिली होती. प्रकरण प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण, असे न करता थेट धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखविणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत. सोमवारी तर आणखी धक्कादायक घटना घडली, एका टीव्हीच्या संपादकास साडेबारा तास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. टीव्हीवरील एका चर्चात्मक कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी १२.३० तास बसवून ठेवणे, यातून केवळ पत्रकारांच्या मनात दहशत निर्माण करणे, हा एकमेव हेतू दिसून येतो, असा आरोपही भाजपने केला आहे.

अनेक गंभीर गुन्ह्यांत सुद्धा आरोपींची अशी चौकशी करण्याचे धाडस हे सरकार दाखवू शकले नाही. मात्र, एका संपादकाची सलग आणि न थांबता ही चौकशी करण्यात आली. याबाबतचा घटनाक्रमसुद्धा ना . म . जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर स्वतः संपादकांनी सांगितला आहे. सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरू आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला असल्याचे भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

एकूणच सध्या राज्यात सुरू असलेले हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणूनच सध्याची परिस्थिती अघोषित आणीबाणीसदृश आहे. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत, याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी आज विरोधी पक्षांतील भाजपने राज्यपालांना भेटून पत्राद्वारे केली आहे. या मागणीची राज्यपाल निश्चित दखल घेतील, अशी खात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Last Updated : Apr 28, 2020, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details