महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक: आम्ही आत्मपरिक्षण करूच, मुख्यमंत्र्यांनीही करावे; फडणवीसांचा ठाकरेंना सल्ला

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. मात्र, काही ठिकाणचे निकाल आणि आलेले कल पाहता भाजपाचा पराभव झाल्याचे दिसत आहे. याबाबत भाजपा नेत्यांनी आता सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.

By

Published : Dec 4, 2020, 12:59 PM IST

Thackeray and Fadnavis
ठाकरे आणि फडणवीस

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला पराभव मान्य असून, त्याचे नक्कीच आत्मपरिक्षण करू. मात्र, खरे आत्मपरिक्षण करण्याची गरज मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला आहे,' असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला. मात्र, शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

विधान परिषद निवडणूक निकालाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

तीन पक्षांच्या शक्तीचे आकलन करण्यास चूक झाली -

विधानसभा निवडणुकी नंतर ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे तीनही पक्षाच्या शक्तीचे आकलन करण्यास भाडपाकडून कुठे तरी चुक झाल्याची कबूली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पुढच्या काळात योग्य रणनिती आखून निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजयी उमेदवारांना शुभेच्छा -

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. चांगल्या कामासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र, या निकालामुळे सरकारने हुरळून जाऊ नये, असाही सल्ला त्यांनी दिला. जनतेमध्ये सरकारबाबत प्रचंड असंतोष असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

...म्हणून बसला भाजपाला फटका -

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका अचानक लागल्या. त्यामुळे नोंदणीसाठी पक्षाला वेळ भेटला नाही. शिवाय या वेळी नोंदणीही सरकारी यंत्रणेमार्फत होती. त्यामुळेही काही प्रमाणात फटका बसल्याचे फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले. उमेदवार कोण असावेत हे सर्वांबरोबर चर्चा करूनच ठरवले होते. तरीही उमेदवार देण्यात काही चुक झाली का? हे तपासून पाहिले जाईल, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनीही दिली प्रतिक्रिया -

'मित्राला मित्र रहायचा नसेल तर, त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. मात्र, आज मित्र सोबत असता तर नक्कीच बळ मिळाले असते,' अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर दिली. पाटील यांना शिवसेनेच्या मित्रपणावर आज उपरती झाल्याची चर्चा आता रंगत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details