मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत. आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही. या घटनेची राज सरकारने गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केले आहे, असेही पवारांनी सांगितले.
पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध केला.