मुंबई: आई-वडिलांच्या आज्ञेत न राहता स्वतःच्या मर्जीने लिव्ह इन रिलेशनच्या (Live in Relation) जाळ्यात अडकलेल्या वसईतील श्रद्धाच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून दिल्लीतल्या जंगलात इतरत्र फेकून दिल्याच्या घटनेने दिल्लीसह मुंबई हादरून गेली. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब अमिन पूनावाला याला माणिकपूर पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे वसईतील तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील (Dcp Sanjay kumar) यांनी. पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि वसईतूनच या तपासाची चक्रे वेगाने फिरली, आणि ती दिल्लीपर्यंत जाऊन धडकली. त्यामुळेच श्रद्धा वालकरच्या क्रूर हत्या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
सहा महिन्यांनी प्रकरण उजेडात : तब्बल सहा महिन्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला वाचा फुटली आणि 14 नोव्हेंबर रोजी आरोपी आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा छडा लागला तो तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी पुढाकार घेत गांभीर्य लक्षात घेऊन सुमोटो दाखल केल्यामुळेचं अशी चर्चा आहे.
काय आहे प्रकरण? : 2019 पासून आफताब आणि श्रद्धा हे एकमेकांना ओळखत होते आणि एकत्र मालाड येथील कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होते. दोघांचे आई-वडील वेगवेगळे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा स्वतंत्र व्यक्तिगत निर्णय घेतला.आणि हाच निर्णय श्रद्धासाठी धोक्याचा ठरला.
दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध:वयाच्या 25 व्या वर्षी श्रद्धाने हा निर्णय आई-वडिलांना न जुमानता घेतला आणि घराबाहेर पडली. श्रद्धा आणि आफताब हे दोघे वसईतील एवरशाईन नगर येथे राहू लागले. त्यानंतर दोघांचे खटके उडू लागले. 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला मारहाण देखील केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, 2022 पर्यंत आफताब आणि श्रद्धा हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. एका डेटिंग ॲपवरून दोघांची ओळख झाली अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, दिल्लीत राहत असताना श्रध्दाच्या मनाविरुध्द आफताबचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले, आणि यातुन निर्माण झालेल्या वादातुनचं श्रध्दाची हत्या झाली.