मुंबई- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारपासून होणाऱ्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. तब्बल 60 वर्षांपासून सुरू असलेली विरोधकांसाठीची चहापान प्रथा यंदा पहिल्यांदाच मोडीत निघणार आहे. याबाबतचा निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
राज्य विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांना चहापान कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येते. हा कार्यक्रम मागील 60 वर्षापासून राज्यात सुरू आहे. यासाठीची प्रथा प्रत्येक सत्ताधारी पक्षांकडून दरवेळी पाळली जाते. अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असतात. त्यांच्यात वितुष्ट येऊ नये किंवा विधिमंडळाचे कामकाज दोघांच्याही सामंजस्याने पुढे नेले जावे यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी निमंत्रण दिले जाते. राज्यात यंदा कोरोनाचा कहर सुरू असल्याने रविवारी (6 सप्टेंबर) ला सत्ताधारी पक्षाकडून सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केला जाणारा चहापानाचा कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.