महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदल; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची टीका

सरकारला राज्यातील जनतेच्या विकासासाठी आलेले अपयश झाकता आले नाही. म्हणूनच त्यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

By

Published : Jun 16, 2019, 8:18 PM IST

भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदल; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची टीका

मुंबई - राज्यात मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्याबरोबरच सरकारला राज्यातील जनतेच्या विकासासाठी आलेले अपयश झाकता आले नाही. म्हणूनच त्यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

अशोक चव्हाण म्हणाले, प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. ते झाकून ठेवणे आता सरकारला कठीण झाले आहे. त्यातच आता लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करायची तयारी नाही. त्यामुळेच प्रकाश मेहता यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याऐवजी त्यांना केवळ मंत्रिमंडळातून बाजुला सारून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा भाजप-शिवसेनेचा खटाटोप सुरू आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते भ्रष्टाचाराचे पाप लपवू शकणार नाही, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.

मागील साडेचार वर्षांचा राज्य सरकारचा कारभार अत्यंत निराशाजनक आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आपले हे अपयश झाकण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा चेहरा-मोहरा बदलल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु, निवडणुकीला आता जेमतेम 4 महिने शिल्लक असून, या फेरबदलांमधून सरकारच्या हाती काहीही येणार नाही. मंत्रिमंडळातील हे फेरबदल निरर्थक असल्याची जाणीव कदाचित शिवसेना पक्षप्रमुखांनाही झाली असावी. त्यामुळेच त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याऐवजी प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी जायला प्राधान्य दिले असावे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्यांचाही समावेश करताना लोकशाहीच्या संकेतांचे उल्लंघन झाल्याची टीका चव्हाणांनी केली. एखादा मंत्री विधीमंडळाचा सदस्य नसल्यास त्याला 6 महिन्यात सदस्य होण्याची मुभा असते, याबाबत दूमत नाही. पण या सरकारचा कार्यकाळच पुढील 4 महिन्यात संपणार आहे. त्यामुळे आमदार नसलेले मंत्री सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होऊ शकणार नाहीत, ही वास्तविकता आहे. तरीही केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोडाफोडीच्या राजकारणासाठी अशा अनेकांना मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार लोकशाही परंपरेचे उल्लंघन करणारा असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details