मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी काँग्रेसला सोडून कमलाबाई म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व गद्दारांना आणि बंडखोरांना या निवडणुकीत पाडा. आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे संदेश देणारे गीत काँग्रेसकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.
'# पाडा रे ' असे या रॅप साँगचे नाव आहे. काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांना जनतेने निवडणुकीत पाडावे. हे लोक स्वतःचे इमान विकून बेइमानी करणाऱ्यांच्या टोळीत जाऊन सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना पाडा, असा संदेश रॅपच्या माध्यमातून एक तरुण गात असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाण्यात जी लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत त्यांचा उल्लेख भगोडे, गुलगुळे, बंडखोर, गद्दार असा करण्यात आला आहे. "आमच्यासोबत जनतेचा हात हाय, गद्दारी करणाऱ्यांना अजिबात थारा नाय, जनता यांना या वेळेस पाडल्या बिगर राहात नाय,....पाडा रे !" अशा ओळी या रॅप साँगमध्ये तरूण गाताना दिसत आहे.